छत्रपती संभाजीनगर: शनिवारी समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात(accident) १२ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २३ जण जखमी झालेत. या अपघाताप्रकरणी चालकासह दोन आरटीओ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली.
दरम्यान, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या या दोनही आरटीओ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असल्याचीही माहिती आरटीओच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास बुलढाणा येथून नाशिककडे जाणाऱ्या मिनी ट्रॅव्हल्स बसला समृद्धी महामार्गावर मोठा अपघात झाला. या बसमधील भाविक हे सैलानी बाबांचे दर्शन घेऊन परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.
या मार्गावर आरटीओच्या अधिकाऱ्यांनी ट्रक थांबवला होता. याचवेळेस ही मिनी ट्र्रॅव्हल बस मागून आली आणि तिची जोरदार धडक या ट्रकला बसली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीतील १२ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २३ जण गंभीर जखमी झाले.
प्रदीप छबुराव राठोड आणि नितीनकुमार गणोरकर अशी कारवाई करण्यात आलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांची नावे आहेत तर ब्रिजेशकुमार कमलसिंग चंदेल असे या चालकाचे नाव आहे त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनेचा व्हिडीओ आला समोर
अपघात झालेल्या ट्रॅव्हल बसमधील प्रवासी बुलढाणा येथील सैलानी बाबाचे दर्शन घेऊन परतत होते. समृद्धी महामार्गावर असताना आरटीओच्या अधिकार्यांनी एक ट्रक चौकशीसाठी रस्त्यात थांबवून ठेवला होता. मागून येणार्या बसचालकाला हा ट्रक थांबला आहे की सुरु आहे याचा अंदाज न आल्याने बस ट्रकला धडकली आणि अपघात झाला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
व्हिडीओतून अपघात होण्याच्या काही वेळ आधीच हा ट्रक थांबवल्याचे दिसत आहे. शिवाय भर रस्त्यातच ट्रकची चौकशी सुरु आहे. आरटीओ अधिकार्यांनी ट्रक अडवला नसता किंवा चौकशीसाठी ट्रक महामार्गाच्या कडेला थांबवला असता तर संभाव्य अपघात टळला असता. त्यामुळे आरटीओच्या चुकीमुळे १२ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra