
कुठून कुठपर्यंत असणार ही मार्गिका?
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून वादात असणार्या मेट्रो-६ साठी कारशेडचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या महायुती सरकारने कांजूरमार्ग येथील (Kanjurmarg) कांजूर येथे मेट्रो ६ साठी कारशेड (Carshed) बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (MMRDA) ने ५०६ कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत.
कांजूरमार्ग कारशेडसाठी राज्य सरकारच्या सूचनेनंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून १५ हेक्टर जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याचं काम पूर्ण झालं आहे. आता मेट्रो सहा मार्गिकेसाठी कारशेड उभारण्याचं काम जलद गतीने सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये स्टॅबलिंग यार्ड, वर्कशॉप, मेंटेनन्स लाईन, ऑटोमॅटिक ट्रेन वॉशिंग सुविधा, डेपो कंट्रोल सेंटर, प्रशासकीय कार्यालय, कर्मचारी निवासस्थान, देखभाल आणि कार्यशाळा इमारती आणि सबस्टेशन यांचा समावेश असणार आहे. कॉन्ट्रॅक्टरला इरादा पत्र प्राप्त झाल्यानंतर, प्रकल्प ३० महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणं अपेक्षित आहे.
मेट्रो ६ मार्गिका ईस्टर्न आणि वेस्टर्न मार्गांना जोडणार असून ती स्वामी समर्थ मार्ग ते जोगेश्वरीपर्यंत असणार आहे. या मार्गिकेची एकूण लांबी १५.३१ किमी असून १३ स्थानकांचा समावेश असणार आहे. यासाठी सुमारे ६७७२ कोटी रुपये खर्च होणार आहेत. मेट्रो ६ ही मेट्रो २ अ, मेट्रो ७, मेट्रो ३, मेट्रो ४, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे यांना जोडणार आहे.