सोलापूर : लंडनमधून महाराष्ट्रात १६ नोव्हेंबर रोजी वाघनखं (Wagh Nakha) मुंबईत आणण्यात येणार आहेत. त्याआधीच ही वाघनखं शिवरायांची आहेत का? यावरुन वाद सुरु झाला आहे. या वादात तोंडसुख घेणारे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या आरोपांना भाजप प्रवक्ते लक्ष्मण ढोबळे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे पितापुत्रांवर जोरदार हल्लाबोल करताना ढोबळे म्हणाले की, 'आमदार, खासदार सोडून गेले त्यामुळे ठाकरे पितापुत्र झोपेत बरळतात. उर बडवून घेतात, शिवसेनेच्या नावावर तुम्ही चोऱ्याच केल्या, आंतरराष्ट्रीय चोर म्हणून तुमचा उल्लेख होतो, अशी टीका लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. तर खासदार संजय राऊत यांना भाडेकरू, चिंधीचोर असे म्हणत चांगलेच फटकारले.
लक्ष्मण ढोबळे म्हणाले, शिवरायांच्या नावावर मातोश्री एक, मातोश्री दोन उभारणारे आज वाघनखांवर संशय घेत आहेत. सरकारला विनाकारण बदनाम करणाऱ्यांवर जरब, दहशत बसावी यासाठी ही वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. या वाघ नखांचा तुम्हाला उपयोग होणार नाही पण तुमच्यावर दहशत राहील.
दुर्दैवाने, गेली ५० वर्षे भगव्या झेंड्याखाली ज्यांनी अध्यात्माची लोकशाही मांडली त्यांचे दिवटे आज छत्रपतींच्या भगव्याला आणि वाघनखांना विरोध करत आहेत. जगातील लोकांना मान्यता दिलेल्या वाघनखांबद्दल पितापुत्र चुकीचे बोलत आहेत. माझा बाप चोरीला गेला असे म्हणतात. चिन्ह गेले, आमदार सोडून गेले तरी देखील वावटळीसारखे ओरडत फिरत आहेत. सरकारला बदनाम करत आहेत, अशा खोटारड्या, रिकामटेकड्या भाषा पंडितांनी हे बंद केले पाहिजे. वाघनखांना पाहून मांजराच्या वाटेने जाणा-यांनी शांत बसावे यासाठी ती वाघनखं आणली जाणार आहेत, असे ढोबळे म्हणाले.