आमदार आशिष शेलार यांची मागणी
मुंबई : कॅगने केलेल्या चौकशीमध्ये पालिकेच्या ८,४८५ कोटींचा भ्रष्टाचार उघड झाला असून या मागचा सुत्रधार कोण हे उघड होणे आवश्यक आहे. त्यासाठी या सर्व कामांची फौजदारी कलमांतर्गत एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
कॅगचा अहवाल हा केवळ २८ नोव्हेंबर २०१९ ते ३१ आक्टोबर २०२२ या कालावधीतील असून यामध्ये कोविडची कामे नाहीत. केवळ ७६ कामांमध्ये ८४८५ कोटींचा हा घोटाळा उघड झाला असून, या प्रकरणी फौजदारी दंड संहिता अंतगर्त एसआयटी स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी आमदार ॲड शेलार यांनी केली आहे.
पालिकेच्या ९ विभागातील ७६ कामांमधील १२ हजार कोटींच्या घोटाळ्यावर कॅगने ताशेरे मारले आहेत. ज्या मुंबई महापालिकेचे नेतृत्व उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करीत होते, त्याचे वर्णन करायचे तर ‘कट, कमिशन आणि कसाई’ असे करता येईल. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकला, असा थेट आरोप अॅड शेलार यांनी केला आहे.
टेंडरविना काम आहे, टेंडर पेक्षा जास्त काम दिली आहेत, टेंडर पडताळणी विना, टेंडर अपात्र असलेल्यांना कामे दिली आहेत. काही ठिकाणी चार कंपन्या सांगून टेंडर दिले पण ती एकच कंपनी आहे. हा टेंडर अटी शर्तीचा भंग आहे, टेंडरमध्ये फेरफार आहे. कुठल्याच सरकारमध्ये झाला नसेल इतका मोठा हा घोटाळा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सॅपमध्ये टेंडर फेरफार झाला आहे. त्यात कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
परेल टीटी उड्डाण पुल, मिठी नदी अशा प्रकारे वरळी, वांद्रे मातोश्री जवळची अनेक कामे निविदा न काढता, नियम न पाळता देण्यात आली. म्हणून या सगळ्याची एसआयटी चौकशी व्हावी, सूत्रधार कोण, हे उघड व्हायला हवे, अशी मागणी त्यांनी केली आहे.