पाणी योजनेच्या मुदतवाढीवरून भाजप आक्रमक

रत्नागिरी :पालिकेच्या शेवटच्या विशेष सभेत शहरातील नळपाणी योजनेच्या कामाला मुदतवाढ देण्यावरून भाजप नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. मुदतवाढ दिली तरीही काम पूर्ण होण्याची शाश्वती ठेकेदार देणार का? असा प्रश्नही उपस्थित केला. विरोधकांनी मांडलेले आक्षेप मान्य करत नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी अटी-शर्थी घालून मुदतवाढ देण्यास मान्यता दिली. तसेच त्या मुदतीत काम झाले नाही, तर ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी, असाही निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

रत्नागिरी पालिकेची विशेष सभा प्रदीप साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये शहर पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या अन्वी कन्स्ट्रक्शनला मुदतवाढ देण्यावरून भाजप नगरसेवक गटनेते समीर तिवरेकर, राजू तोडणकर, मुन्ना चवंडे, सुप्रिया रसाळ यांच्यासह अपक्ष नगरसेवक विकास पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला. नळपाणी योजनेचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत रस्त्यांची कामे होणार नाहीत. शहरातील काही भागांमध्ये अजूनही कामे पूर्ण झालेली नाहीत. अन्वी कन्स्ट्रक्शनकडून कामे करण्यासाठी पुरेसे कामगार दिले जात नाहीत. नगरसेवकांची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे उर्वरित कामे पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासनाची राहील.

मुदत वाढवून दिल्याच्या कालावधीत ठेकेदार काम पूर्ण करेलच याची जबाबदारी कोण घेणार आहे. दिड वर्षांपूर्वी काम सुरू होण्यास आठ महिन्यांचा उशिर झाल्यानंतर ठेकेदाराने पालिकेकडून अतिरिक्त निधी मागून घेतला. आता तीन ते चार वेळा मुदत देऊनही ठेकेदार दिरंगाई करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तिवरेकर यांनी केली. तर तोडणकर म्हणाले, काम पूर्ण झालेल्या भागातील पाईपलाईन फुटून पाणी बाहेर पडत आहे. त्यासाठी रस्ता खोदावा लागतोय. एस.टी. बसस्थानकाच्या खालील काही भागात ही परिस्थिती उद्भवत आहे. याला ठेकेदार जबाबदार नाही का? आक्रमक झालेल्या सदस्यांना शांत करत नगराध्यक्षांनी संबंधित ठेकेदाराला बोलावून त्याच्याकडून काम पूर्ण करण्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र घ्यावे अशी सुचना मुख्याधिकाऱ्यांना केली.

नगराध्यक्ष साळवी म्हणाले की, आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. २,८०३ अतिरिक्त जोडण्या द्यावा लागत आहेत. त्यामुळे काम करण्यासाठी वेळ लागणार आहे. ठेकेदाराकडून काम करवून घेण्यासाठी पालिकेला संयम बाळगावा लागत आहे. योजना शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला अटी-शर्थी घालूनच ३१ मे २०२२ पर्यंत मुदतवाढ द्या.

मुरुगवाड्याला जोडणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरण ठरावावरून सत्ताधारी शिवसेनेला भाजप नगरसेवकांनी धारेवर धरले. भाजप गटनेते तिवरेकर म्हणाले, हा रस्ता माझ्या प्रभागातून जात असतानाही याबाबत नगरपालिकेकडून विचारणा झालेली नाही. आम्ही दिलेल्या रस्त्यांची कामे मंजूर होत नाहीत. याकडे नगराध्यक्ष लक्ष देणार का? आम्ही शिवसेनेच्या प्रभागातील एखादे काम सुचवले तर तो तुमचा प्रभाग नाही असे सांगितले जाते. जसे मुरुगवाड्यातील रस्त्याचे काम प्राधान्याने करायला घेतली जातात, तशी आमचीही कामे झाली पाहिजेत, असे ठणकावले. यावर नगराध्यक्ष साळवी यांनी तिवरेकर यांनी सुचवलेल्या रस्त्याचे काम मंजूर झाल्याचे सांगत यावर तोडगा काढला.
Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे