नवी मुंबई (प्रतिनिधी) : इतर सिगारेटला पर्याय व धुम्रपानाच्या सवयी सुटाव्यात यासाठी ई-सिगारेट बाजारात आल्या. पण या ई-सिगारेटमध्ये असलेले पदार्थ शरीराला घातक असतात. याची जाणीव केंद्र व राज्य सरकारला झाली. त्यामुळे शासनाने यावर बंदी आणली; परंतु आजही या सिगारेटची विक्री नवी मुंबईमधील काही भागांत सर्रास होऊ लागली आहे.
विशेष म्हणजे ई-सिगारेटचे व्यसन तरुण बांड, शाळकरी विद्यार्थ्यांना लागले आहे. यामुळे या तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. हे होऊ नये म्हणून ई-सिगारेट विरोधात नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी पुढाकार घेत ई-सिगारेट विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे. रवींद्र सावंत यांच्या मागणीला वैद्यकीय तज्ज्ञांनी देखील सहमती दाखवली आहे.
यामुळे भविष्यात गंभीर कर्करोगासारख्या आजारांचा सामना करावा लागत असून ई-सिगारेट घातक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कर्करोगाचे कारण
सिगारेट म्हणजे कागदात गुंडाळलेली असते. त्यात तंबाखू, निकोटिन असते. जे मज्जासंस्थेवर कार्य करते. तसेच व्यासनास कारणीभूत ठरते. निकोटिन व्यतिरिक्त धुरामध्ये अनेक हानिकारक रसायने असतात. त्यामुळे अस्थमा, फुप्फुसाचे कर्करोग होत असतात, असे डॉ. हेमंत इंगोले यांनी सांगितले.
ई-सिगारेटमध्ये द्रव आणि एरोसोल पदार्थामध्ये निकोटिन, सोलव्हेट वाहक (पिजी आणि ग्लिसरॉल), तंबाखू-विशिष्ट नायट्रोसेमाईंस (टीएसएनए), अल्डीहाईड्स, धातू, अस्थिर सेंद्रिय संयुगे, फिनोलिक संयुगे, पोलिसायकलिक सुगंधी हायड्रॉ कार्बन, तंबाखू अल्कलॉईडस आणि औषधे असतात. – डॉ. सुशांत आंधळे, नवी मुंबई