मुंबई: स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेसाठी(ajinkya rahane) टीम इंडियामध्ये परतण्याचे सर्व मार्ग पूर्णपणे बंद होताना दिसत आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये अजिंक्य रहाणे फलंदाजीत चांगली कामगिरी करत नाही आहे. छत्तीसगडविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या सामन्यात अजिंक्य रहाणे केवळ १ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
रणजी ट्रॉफीमध्ये या हंगामात खेळलेल्या ६ डावांमध्ये रहाणेला केवळ ३४ धावा करता आल्या. टीम इंडियात परतण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अजिंक्य रहाणेवर आता मुंबई संघातूनही ड्रॉप होण्याची टांगती तलवार आहे.
रणजी ट्रॉफीच्या या हंगामात अजिंक्य रहाणेला नशीबाची अजिबात साथ मिळत नाही आहे. रहाणे फॉर्मशिवाय फिटनेसबाबतही झगडत आहे. दुखापतग्रस्त होण्याच्या कारणामुळे रहाणे दोन सामन्यात खेळू शकला नाही. याशिवाय रहाणेच्या ६ डावांमध्ये सर्वाधिक धावसंख्या १६ इतकी होती. दोनदा रहाणेला खाते खोलण्यात यशस्वीही ठरला नाही.
इतर तीन डावांत रहाणेने ८,९ आणि एक धाव केली. इतक्या खराब परफॉर्मन्सनंतर रहाणेसाठी टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याची कोणतीही शक्यता उऱलेली नाही. अजिंक्य रहाणेने नुकतेच भावूक होत म्हटले होते की त्याला टीम इंडियासाठी १०० कसोटी सामने खेळायचे आहेत. मात्र आता अजिंक्य रहाणेचे हे स्वप्न स्वप्नच राहील असे वाटते. रहाणेने आतापर्यंत भारतासाठी ८५ कसोटी सामने खेळले आहेत.
गेल्या वर्षी रहाणेला टीम इंडियामध्ये कमबॅकची संधी मिळाली होती. रहाणेने डब्लूटीसी फायनलच्या दोन डावांत फलंदाजीने कमाल केली होती. मात्र रहाणेची बॅट वेस्ट इंडिज दौऱ्यावर अयशस्वी ठरली. यानंतर रहाणेला टीम इंडियाच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.