मुंबईत मॅन मेड फॉरेस्ट, ग्रीन कव्हर, सेंट्रल पार्क तयार होणार
नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या लोकार्पणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या महत्त्वाच्या घोषणा
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते आज नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या (Nair Hospital Dental college) विस्तारित नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळेस त्यांनी सफाई कर्मचार्यांच्या (Sanitation workers) मुलांसाठी खुशखबर दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मुंबई महापालिका सर्व सुविधा उपलब्ध असणाऱ्या देशातील पालिकांपैकी एक आहे. क्वालिटी आणि क्वॉन्टीटीमध्ये (Quality and Quantity) काहीच तडजोड नाही. मुंबईचा हिरो सफाई कर्मचारी आहे. त्यामुळे सफाई कर्मचार्यांच्या मुलांच्या परदेश शिक्षणाचा खर्च पालिका करणार आहे”, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
एकनाथ शिंदे म्हणाले, १० हजार कोटीपेक्षा जास्तीचे प्रकल्प कधीच झाले नव्हते. राज्यात आता २ लाख कोटींचे प्रकल्प मुंबई मनपात सुरु आहेत. नायर हॉस्पिटलचे हे कॉलेज फाईव्ह स्टार हॉटेल (5 star Hotel) पेक्षा कमी नाही. ऑपरेशन कसं करतात हे देखील मी आता बघितलं. मी पण ऑपरेशन केले आहेत. डॉक्टरेट मला मिळण्याआधीच मी ऑपरेशन केले आहेत, असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं.
मुंबईत मॅन मेड फॉरेस्ट तयार करणार
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, लोकांना आता मुंबईत खड्डे बघायला मिळणार नाहीत. आम्ही प्रदूषण मुक्त मुंबई करणार आहोत. ग्रीन कव्हर तयार करणार आहोत. शिवाय मॅन मेड फॉरेस्ट तयार करण्याची तयारी सुरु आहे. २०० एकरमध्ये जागतिक दर्जाचे उद्यान बनवतोय. रेस कोर्समध्ये घोडे पळायचे आता मुलं पळतील. गार्डन्स म्हणजे शहरांची फुप्फुसं आहेत. मुंबईत देखील एक मोठे सेंट्रल पार्क होईल.
३ हजार कोटी रुपयांची औषधे फ्री दिली
झिरो प्रिस्क्रिप्शन हॉस्पिटल केले आहेत आणि ३ हजार कोटी रुपयांची औषधे फ्री दिली आहेत. जगातील पहिली महापालिका आहे जी ३ हजार कोटी रुपयांची औषधे फ्री देणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले, केईएमला गेलो होतो तेव्हा ३ वॅार्ड बंद होते आता ते सुरु केले आहेत. ३६० बेड वाढतील. यावेळेस ‘घरी बसून काही कळत नाही फिल्डवर जावे लागते. मला काय मिळतं यापेक्षा लोकांना काय मिळतंय हे बघा’, असा त्यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोलाही लगावला.