राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यात ‘सावरकर गौरव यात्रा’
मुंबई: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. तसेच काल मालेगाव येथे राहुल गांधींवर उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका हे, ‘उशीरा सुचलेले शहाणपण आहे’, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार असल्याचीही घोषणा केली.
एकनाथ शिंदे म्हणाले, ”राहुल गांधी वारंवार म्हणतात, मी सावरकर नाही, गांधी आहे. सावरकर होण्याची तुमची लायकी नाही. तेवढा त्याग, देशाबद्दल प्रेम असायला पाहिजे. तुम्ही काय सावरकर होणार? तुम्ही परदेशात जाऊन देशाची निंदा करता. आपल्या देशात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे समजू शकतो, पण परदेशात जाऊन निंदा करणे हा देशद्रोह आहे,’ अशी जहरी टीकाही त्यांनी यावेळी केली.
बाळासाहेब ठाकरे असते तर सावरकरांचा अपमान सहन केला असता का?
उद्धव ठाकरे यांचा समाचार घेताना शिंदे म्हणाले, ”हिंदुत्व-हिंदुत्व म्हणणाऱ्यांनी राहुल गांधींविरोधात एकही शब्द काढला नाही. राहुल गांधींची खासदारकी कायद्याने गेली, त्याविरोधात यांनी काळ्या फिती बांधून निषेध केला. आज सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणता. तुम्ही राहुल गांधींना जाब विचारला पाहिजे. कालचे वक्तव्य म्हणजे, उशीराने सुचलेले शहानपण आहे, असं म्हणतं त्यांनी, बाळासाहेब असते तर सावरकरांचा अपमान सहन केला असता का?”, असा सवालही उपस्थित केला.
दरम्यान, राहुल गांधी यांनी वीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत.