Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरविरारमध्ये भीषण पाणीटंचाई

विरारमध्ये भीषण पाणीटंचाई

विरार : विरार पूर्व भागाला मागील अनेक दिवसांपासून पाणीटंचाईच्या भीषण झळा बसत असून, अनेक भागांमध्ये आठवडाभरातून एकदाच पाणीपुरवठा होत आहे, त्यामुळे त्रस्त झालेल्या विरारवासीयांनी पालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढला.

या भागात आधीच तीन ते चार दिवसांआड पाणी येते. त्यातच आता पावसाने ओढ दिल्याने उकाडा वाढला असताना, आठ दिवसांतून एकदा पाणी येत आहे. या अनियमित पाणीपुरवठ्याबाबत पालिकेला जाब विचारण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक अखेर पालिकेच्या कार्यालयावर धडकले.

विरार पूर्व भागातील फुलपाडा, मनवेल पाडा, कारगिल नगर, सहकार नगर या भागांतील रहिवाशांना मागील तीन ते चार महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच ऐन उन्हाळ्यात तीन ते चार दिवसांआड पाणी येत असल्याने त्यांचे पाण्यावाचून हाल झाले. मागील दोन आठवड्यांपासून तर आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. त्रस्त नागरिकांनी पाण्यासाठी पालिकेवर मोर्चा काढला होता.

या मोर्चामध्ये दोन हजाराच्या आसपास नागरिक सहभागी झाले होते. यावेळी पाणीटंचाईच्या मुद्यावरून पालिकेला जाब विचारण्यात आला. आंदोलकांनी या मुद्यावरून पालिकेचे डेप्युटी इंजिनीअर प्रदीप पाचंगे आणि प्रभारी साहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांना लेखी निवेदन दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -