Monday, August 24, 2026

Nashik : वनवासी बांधवांसोबत जुळणार दैवी बंधाची वीण, धनश्रीदीदींच्या उपस्थितीत शुक्रवारी चारोसे येथे रक्षाबंधन उत्सव

Nashik : वनवासी बांधवांसोबत जुळणार दैवी बंधाची वीण, धनश्रीदीदींच्या उपस्थितीत शुक्रवारी चारोसे येथे रक्षाबंधन उत्सव

Nashik : भाऊ-बहिणीच्या निर्मळ प्रेमाला दैवी भ्रातृभावाची व्यापक जोड देणारा स्वाध्याय परिवाराचा विशेष ‘रक्षाबंधन उत्सव’ शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी चारोसे, ता. दिंडोरी येथील वनवासी गावात उत्साहात साजरा होणार आहे. स्वाध्याय परिवाराचे (Swadhyaya Parivar) प्रवर्तक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले यांची सुपुत्री व स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख श्रीमती धनश्रीदीदी तळवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी ३ वाजता हा सोहळा होणार असून, हजारो वनवासी बांधव आणि स्वाध्यायी या भावपूर्ण सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. भारतीय संस्कृतीने मानवाच्या भावविश्वाला समृद्ध करणाऱ्या अनेक उत्सवांची परंपरा दिली आहे. त्यापैकी रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या विशुद्ध प्रेमाचा, परस्पर स्नेहाचा आणि संरक्षणाच्या भावनेचा पवित्र उत्सव मानला जातो. या नात्याला केवळ कौटुंबिक मर्यादेत न ठेवता त्याला दैवी व विश्वबंधुत्वाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून केला जात आहे. ( Nashik News )

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि मालेगाव या जिल्ह्यांतील सुमारे ११,५०० स्वाध्यायी बंधु-भगिनी गेल्या दोन वर्षांपासून १,६५० वनवासी गाव-पाड्यांमध्ये सातत्याने जात आहेत. कोणत्याही अपेक्षेविना वनवासी बांधवांना आत्मीयतेने भेटून त्यांच्याशी निर्मळ आणि निःस्वार्थ नाते जोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. गीता सांगते त्या हृदयस्थ भगवंताचा विचार आणि दैवी नात्याची अनुभूती परस्परांपर्यंत पोहोचविण्याच्या या प्रयत्नातून वनवासी बंधु-भगिनी आणि स्वाध्यायी यांच्यात आत्मीयतेचा भाव दृढ झाला आहे. या भावबंधाचा उत्सव म्हणून चारोसे येथे रक्षाबंधनाचा हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ( Nashik News )

या कार्यक्रमात हजारो स्वाध्यायी युवक-युवती विशेष नृत्यगीताद्वारे पूजनीय धनश्रीदीदींना मानवंदना देणार आहेत. पूजनीय धनश्रीदीदी तळवलकर यांचे मंगल प्रवचन हा उत्सवाचा प्रमुख आकर्षणबिंदू ठरणार आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि मालेगाव जिल्ह्यांतील ज्या वनवासी बंधु-भगिनींशी स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून आत्मीयतेचे नाते निर्माण झाले आहे, त्यातील हजारो जण या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच भक्तिफेरीच्या माध्यमातून वनवासी गावांमध्ये हृदयस्थ भगवंताचा आणि दैवी भ्रातृभावाचा विचार पोहोचविणारे हजारो स्वाध्यायीही या पावन उत्सवासाठी एकत्र येणार आहेत. ( Nashik News )

स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले यांनी दैवी भ्रातृभावाच्या नात्याने वैश्विक स्वाध्याय परिवाराची निर्मिती केली. रक्षाबंधनासारख्या निर्मळ उत्सवात काही प्रमाणात यांत्रिकता आली असताना, या नात्याला पुन्हा दैवी व आत्मीय परिमाण देण्याचा प्रयत्न स्वाध्याय परिवार करत आहे. केवळ भाऊ-बहिणीचे नाते नव्हे, तर समाजातील सर्व नात्यांचे उदात्तीकरण व ऊर्ध्वीकरण व्हावे, या भावनेतून स्वाध्याय परिवार गेल्या अनेक वर्षांपासून आगळ्या पद्धतीने रक्षाबंधन उत्सव साजरा करत आहे. वनवासी बांधव आणि स्वाध्यायी यांच्यातील या आत्मीय भावबंधाचा साक्षीदार ठरणारा चारोसे येथील रक्षाबंधन सोहळा त्यामुळे विशेष ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >