Wednesday, August 19, 2026

Ritu Tawde : तुमची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही; महापौरांनी विरोधकांना भरला दम

Ritu Tawde : तुमची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही; महापौरांनी विरोधकांना भरला दम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका सभागृहात विरोधकांकडून अपशब्द वापरत गैरवर्तन केल्यानंतर महापौरांचा पारा चांगला वाढला. महापौरांनी विरोधी पक्षातील नगरसेवकांना त्यांच्या भाषेत उत्तर देत ' तुमची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही’ सांगून ठेवते ' अशा शब्दांतच त्यांचा समाचार घेत इशारा दिला. त्यामुळे सभागृहात अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसून आक्रमक झालेल्या महापौरांना अशाप्रकारे संतप्त होवून इशारा देण्याचा हा पहिलाच प्रयत्न असून या पदावरून अधिनियमातीलल तरतुदींचा वापर करत गैरवर्तन करणाऱ्या सदस्याला बाहेर काढणे आवश्यक असताना महापौरांकडूनही त्याच पध्दतीचे उत्तर देणे यामुळे सभागृहाची प्रतिमा आणि कामकाज यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. महापालिका सभागृहात बेस्टचा विकास करण्यासाठी कायाकल्प प्रकल्प योजनेला तत्वता मान्यता देण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरु असताना महापौरांनी सभागृहनेते गणेश खणकर यांचे नाव पुकारले. त्यानंतर गणेश खणकर यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर काँग्रेसचे अश्रफ आझमी आणि राजा रहेबर खान यानी आक्षेप घेण्यास सुरुवात केली. त्यांनी धमकी आणि इशारा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजा रहेबर खान यांच्याकडून अपशब्द तसेच गैरवर्तन झाल्यामुळे यावर भाजपचे प्रकाश दरेकर तीव्र आक्षेप घेतला.

त्यानंतर महापौर रितू तावडे यांनी यावर निरिक्षण नोंदवून राजा रहेबर खान यांना आपण कुणाला धमकी देता, हे वर्तन बरोबर नाही. ही दादागिरी चालणार नाही. राजा हे चांगले नाही. ही आपली भाषा बरोबर नाही. शांतपणे घेते म्हणून आपण गृहीत धरु नये. ही पध्दत बरोबर नाही. अशी दादागिर खपवून घेणार नाही, हे मी तुम्हाला आज सांगून ठेवते. त्यामुळे महापौर आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये जोरदार खडांजंगी उडाली होती. त्यामुळे काही काळ सभागृहातील वातावरण तापले होते. परंतु खणकर हे बोलायला उभे राहिल्यानंतर विरोधकांकडून हा गोंधळ घालत त्यांच्या भाषणांत व्यत्यय आणला जात आहे. त्यामुळे विरोधकांकडून गोंधळ सुरु झाल्यानंतर महापौरांनी खणकर यांना भाषण कायम सुरु ठेवण्यास सांगितले.

परंतु काही निवृत्त अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महापौर हे या सदनाचे अध्यक्ष असतात आणि त्या पदावर बसनू चिडून आणि संतापून बोलणे हे योग्य नसते. सदस्यांनी गोंधळ घातला, अपशब्द वापरला, गैरवर्तन केले तर त्यांना अधिनियमातील तरतूदीनुसार एक दिवसांसाठी, एक सभेपुरती किंवा गंभीर प्रकार असेल तर अधिक कालावधीकरता निलंबन करण्याचे प्रावधान आहे. त्यामुळे या सभाशास्त्राचा उपयोग महापौरांनी करायला हवा होता. सभा शास्त्र बिघडवणे हे विरोधकांचे काम असते आणि सभा शास्त्रानुसार चालवणे हे महापौरांचे आणि सत्ताधाऱ्यांचे काम असते. त्यामुळे महापौरांनी डोक्यावर बर्फ ठेवून निश्चित केलेले कामकाज उरकून घेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे विरोधकांना विश्वासात घेवून जो महापौर काम करतो तोच यशस्वी होतो हा इतिहास आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >