- मंत्री नितेश राणे; खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक
मुंबई : रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल येथील मच्छिमार बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि त्यांच्या बोटींवर आकारण्यात आलेला दंड यांसारख्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या शासकीय निवासस्थानी बुधवारी महत्त्वाची बैठक पार पडली. खासदार सुनील तटकरे यांच्या समवेत झालेल्या या बैठकीत मच्छीमारांच्या अडीअडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
लहान आकाराच्या मासेमारी जाळ्यांचा वापर केल्यामुळे स्थानिक मच्छिमार बांधवांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते लवकरात लवकर मागे घेण्यात यावेत आणि त्यांच्यावर आकारण्यात आलेल्या दंडामध्ये योग्य ती शिथिलता देण्यात यावी, असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पारंपरिक पद्धतीने समुद्रात मासेमारी करणाऱ्या कोणत्याही मच्छीमार बांधवावर प्रशासनाकडून अनावश्यक कारवाई केली जाऊ नये, अशी तंबीही त्यांनी यावेळी दिली.
केंद्राच्या धर्तीवर राज्यात राबविण्यात येत असलेल्या 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने'मध्ये मच्छीमारांसाठी अनेक महत्त्वपूर्ण व कल्याणकारी तरतुदी करण्यात आल्या आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त लाभ तळागाळातील मच्छीमार बांधवांपर्यंत पोहोचवावा, तसेच या योजनांची सविस्तर माहिती देण्यासाठी विविध ठिकाणी विशेष शिबिरांचे (कॅम्प) आयोजन करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. सुवर्णगड या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीस विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे, मत्स्यआयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने स्थानिक मच्छीमार बांधव उपस्थित होते.






