नवी मुंबई : खारघरमधील पांडवकडा धबधब्यात मंगळवारी संध्याकाळी एका १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. या वर्षीच्या पावसाळ्यात या परिसरात बुडून मृत्यू होण्याची ही चौथी घटना आहे. मृत मुलाची ओळख प्रणव मिश्रा (१६) अशी असून तो कुर्ला येथील रहिवासी होता.
सायंकाळी ५.४९ च्या सुमारास खारघर अग्निशमन केंद्राला प्रणव बुडाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर एक फायर जीप आणि अग्निशमन दलाचे एक पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. धबधब्यातून पाण्याचा प्रचंड प्रवाह वाहत असल्याने, अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली आणि अखेरीस प्रणव सुमारे १० ते १२ फूट खोल खडकांमधील फटीत अडकलेला सापडला.
अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रणवला पाण्यातून बाहेर काढले, स्ट्रेचरवरून टेकडीच्या पायथ्याशी आणले. त्यानंतर त्याला घटनास्थळी असलेल्या रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.
पुढील चौकशीत काय समोर आले ?
खारघर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असून पुढील चौकशी करत आहेत. खारघर पोलीस अधिकाऱ्याने लोकांना खोल पाण्यात जाणे टाळण्याचे आवाहन केले असून, विशेषतः पावसाळ्यात अशी ठिकाणे अत्यंत धोकादायक असू शकतात असा इशारा दिला आहे. "पावसाळ्यात पाण्याची पातळी आणि प्रवाह अचानक बदलू शकतात, त्यामुळे पर्यटकांनी खोल पाण्यात उतरणे टाळावे." असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
अग्निशमन दलाचे जवान प्रशांत दरेकर, एन. एम. काडू, यू. एम. पाटील, सी. सी. पवार, एस. बी. मोहिते आणि चालक/ऑपरेटर एस. व्ही. पाटील यांचा या बचावकार्यात महत्त्वाचा वाटा आहे.






