Tuesday, August 18, 2026

Jyotiba Shravan Shashti Yatra 2026 : श्री ज्योतिबा श्रावण षष्ठी यात्रेला २ लाख भाविकांची उपस्थिती

Jyotiba Shravan Shashti Yatra 2026 : श्री ज्योतिबा श्रावण षष्ठी यात्रेला २ लाख भाविकांची उपस्थिती

कोल्हापूर : वाडी रत्नागिरी म्हणजे जोतिबा डोंगर येथील श्री ज्योतिबा श्रावण षष्ठी यात्रेला यंदा भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात्रेनिमित्त गाभारा दर्शन तसेच गाभाऱ्याबाहेरील व मंदिर परिसरातील दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता सुमारे २ लाख भाविकांनी यात्रेस उपस्थिती लावल्याचा अंदाज आहे. यात्रेतील विशेष आकर्षण ठरले ते पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांनी विदेशातून आणलेले निळे फूल. या निळ्या फुलाने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले असून यात्रेच्या धार्मिक व सांस्कृतिक वातावरणात त्याची विशेष भर पडली.

गाभारा दर्शन घेतलेल्या भाविकांची संख्या ३७ हजार १२७ इतकी असून, शिखर व मंदिर परिसरातून दर्शन घेतलेल्या भाविकांची अंदाजित संख्या ७४ हजार ९२० आहे. यानुसार नोंद झालेली एकूण अंदाजित संख्या १ लाख १२ हजार ४७ इतकी आहे. याशिवाय गाभाऱ्याबाहेरील दर्शन तसेच मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या भाविकांची संख्या विचारात घेतल्यास यात्रेतील एकूण भाविकांची उपस्थिती सुमारे २ लाखांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे.

भाविकांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर दर्शन व्यवस्था, गर्दी नियंत्रण, सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, अन्न सुरक्षा तसेच भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि देवस्थान समितीच्यावतीने व्यापक नियोजन करण्यात आले होते.

यात्रेच्या व्यवस्थापनामध्ये प्रांत अधिकारी समीर शिंगटे, पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, तहसीलदार पन्हाळा माधवी जाधव शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, तसेच अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. ज. पाचपुते यांच्यासह विविध शासकीय विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

यात्रेच्या संपूर्ण व्यवस्थेचे उत्कृष्ट नियोजन जिल्हाधिकारी तथा प्रशासक डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे यांनी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि संबंधित विभागांमध्ये आवश्यक समन्वय साधत यात्रेच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवले.

ऑफिस इनचार्ज धैर्यशील तिवले यांनी यात्रेच्या प्रत्यक्ष व्यवस्थापनामध्ये विविध यंत्रणांशी समन्वय साधत महत्त्वाची भूमिका बजावली.

मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असूनही प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि देवस्थान समितीच्या संयुक्त नियोजनामुळे यात्रा शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरळीतपणे पार पडली.

यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, देवस्थान समितीचे कर्मचारी, स्वयंसेवक तसेच भाविकांचे देवस्थान समितीच्यावतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >