Tuesday, August 18, 2026

Nitesh Rane : सिंधुदुर्गमध्ये 'रिव्हर्स मायग्रेशन'साठी मंत्री नितेश राणेंनी घेतलेल्या मेहनतीला फळ; पहिला पंचतारांकित हॉटेल प्रकल्प दृष्टिपथात

Nitesh Rane : सिंधुदुर्गमध्ये 'रिव्हर्स मायग्रेशन'साठी मंत्री नितेश राणेंनी घेतलेल्या मेहनतीला फळ; पहिला पंचतारांकित हॉटेल प्रकल्प दृष्टिपथात

 सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सोनेरी दिवस

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक पर्यटन नकाशावर आणण्यासह स्थानिक पातळीवर रोजगाराच्या अफाट संधी निर्माण करण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ आता दिसू लागले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्या पंचतारांकित 'ताज' हॉटेल प्रकल्पाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे जिल्ह्याच्या विकासात एक सोनेरी अध्याय जोडला गेला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणातील तरुणांसाठी 'रिव्हर्स मायग्रेशन'चे मार्ग खुले झाले असून, जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळणार आहे.

मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), जगप्रसिद्ध 'ताज' हॉटेल आणि स्थानिक जमीनदारांच्या प्रतिनिधी मंडळामध्ये त्रिपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री नितेश राणे यांनी हा दिवस सिंधुदुर्गसाठी सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवणारा ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले आहे. आदरणीय राणे साहेबांनी सिंधुदुर्गाला महाराष्ट्राचा एकमेव 'पर्यटन जिल्हा' म्हणून दिलेली ओळख आज खऱ्या अर्थाने फळाला येत असून, पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याची आर्थिक उलाढाल आणि दरडोई उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्ट अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पहिल्या फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाच्या आगमनामुळे सिंधुदुर्गमध्ये जगभरातील पर्यटक आकर्षित होईल. परिणामी स्थानिक बाजारपेठेला आणि उद्योजकतेला मोठी चालना मिळेल. जिल्ह्याबाहेर गेलेल्या तरुण-तरुणींना पुन्हा आपल्या मातीत परतण्यासाठी रोजगाराच्या दर्जेदार संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री शंभुराज देसाई, स्थानिक आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर, निलेश राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी आणि त्यांची संपूर्ण महसूल टीम, एमटीडीसीचे वरिष्ठ अधिकारी तसेच अत्यंत सकारात्मक भूमिका बजावणारे स्थानिक नागरिक व संघाचे त्यांनी आभार मानले. हा फक्त ट्रेलर असून, भविष्यात पर्यटनाच्या माध्यमातून असे अनेक मोठे रोजगारनिर्मितीचे प्रकल्प सिंधुदुर्गच्या उंबरठ्यावर उभे राहणार असल्याचा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >