Wednesday, August 5, 2026

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेच्या ४ मंत्र्यांना शेवटचा अल्टीमेटम

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेच्या ४ मंत्र्यांना शेवटचा अल्टीमेटम

- कामगिरीत सुधारणा झाली नाही तर नारळ देणार; पक्षवाढ आणि जनतेच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने उपमुख्यमंत्री संतापले

मुंबई : स्वपक्षातील चार मंत्र्यांच्या अकार्यक्षमतेवर आणि सुस्त कारभारावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत मंत्रिमंडळातून गच्छंतीचा इशारा दिला आहे. मंगळवारी दुपारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी पार पडलेल्या पक्षाच्या प्री-कॅबिनेट बैठकीत शिंदे यांनी या चार मंत्र्यांची कठोर शब्दांत कानउघाडणी केली. 'जनतेची कामे गतीने करा आणि आपापल्या मतदारसंघासह विभागांत पक्षसंघटन वाढीवर भर द्या, अन्यथा मंत्रिमंडळातून उचलबांगडी अटळ आहे,' असा इशाराच शिंदे यांनी संबंधित मंत्र्यांना दिला आहे.

मंत्रालयात शिवसेनेच्या नऊ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही गरमागरम चर्चा झाली. सहसा स्वपक्षीय नेत्यांवर जाहीर अथवा अंतर्गत बैठकांमध्ये आक्रमक न होणाऱ्या एकनाथ शिंदेंचा हा रुद्र अवतार पाहून पक्षाच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र यांसारख्या महत्त्वाच्या पट्ट्यांमध्ये शिवसेनेचे मंत्री पक्षवाढीसाठी पुरेसे प्रयत्न करत नाहीत आणि सर्वसामान्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत शिंदे यांनी बैठकीत बोलून दाखवली. (Politics)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मंत्र्यांच्या कामाचा आलेख आणि त्यांच्याबाबतच्या तक्रारींमुळे शिंदे कमालीचे अस्वस्थ होते. काही प्रशासकीय प्रकल्प आणि कंत्राटदारांच्या कामांत स्वतःचे हितसंबंध शोधणे, सरकारची भूमिका डावलून अवाजवी वक्तव्ये करणे, तसेच पक्षाच्या आमदार आणि खासदारांना कामात सहकार्य न करणे यावरून त्यांनी संबंधित मंत्र्यांना नाव न घेता खडे बोल सुनावले. मागील दीड वर्षातील आपल्या कामकाजाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी सर्व मंत्र्यांना दिले आहेत. (Maharashtra News)

मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याचे संकेत

दरम्यान, आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याचे संकेत उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दिलेला अवधी आणि मिळालेल्या संधीचा वापर करून कामगिरी सुधारली नाही, तर अशा निष्क्रीय मंत्र्यांना हटवून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेच्या मंत्र्यांचे काम सुधारते की शिंदे त्यांना नारळ देऊन खांदेपालट करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >