Thursday, July 30, 2026

Ahilyangar : मुलीने पळून जाऊन लग्न केल्याचा राग, संतापाच्या भरात सासूने केलं असं काही की...

Ahilyangar : मुलीने पळून जाऊन लग्न केल्याचा राग, संतापाच्या भरात सासूने केलं असं काही की...

Ahilyangar : अहिल्यानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग अनावर झाल्याने तिच्या आईने केलेल्या या एका कृतीची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. मुलीने प्रेमविवाह केल्याने भडकलेल्या आईने मुलीच्या पतीला थेट न्यायालयाच्या आवारात अडवण्याचा प्रयत्न केला. बरं यानंतर मुलीची आई चक्क जावई चालवत असलेल्या कारच्या बोनेटवर जाऊन बसली. धक्कादायक म्हणजे मारहाणीच्या भीतीने त्याने कार पळवली मात्र तरीही आई खाली उतरली नाही.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील मातापूर येथील एका तरुणीने दहा दिवसांपूर्वी केसापूर येथील तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. मुलगी घरातून गेल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी ती हरवल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. दरम्यान, दोघांनीही विवाह केल्याचे समोर आल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात (Court) पोहोचले. सोमवारी दोघेही न्यायालयात हजर झाले. ते सज्ञान असल्याने न्यायालयाने त्यांच्या विवाहाला मान्यता दिली. मात्र, हा विवाह मुलीच्या आईला मान्य नव्हता.

सासू थेट जावयाच्या कारच्या बोनेटवर चढली अन्

न्यायालयाबाहेर येताच तिने जावयाला अडवण्याचा प्रयत्न केला आणि थेट त्याच्या कारच्या बोनेटवर जाऊन बसली. घाबरलेल्या तरुणाने कार सुरू केली. तरीही ती महिला बोनेटवरून खाली उतरली नाही. न्यायालय परिसरापासून सय्यदबाबा दर्गा परिसरापर्यंत हा थरार सुरूच होता. दरम्यान, महिलेने कारची काच फोडण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी कार थांबवली. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांना शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी दोन्ही बाजूंची समजूत काढत वाद मिटवला.

दोघेही सज्ञान असल्याने त्यांचा विवाह कायदेशीर असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच कारच्या नुकसानीबाबत तरुणाने कोणतीही तक्रार दिली नाही, तर महिलेनेही गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने हे प्रकरण अखेर समोपचाराने निकाली काढण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >