Thursday, July 2, 2026

Horrific bus accident : रत्नागिरीत दोन बसेसची समोरासमोर धडक; १५ विद्यार्थी जखमी

Horrific bus accident : रत्नागिरीत दोन बसेसची समोरासमोर धडक; १५ विद्यार्थी जखमी

रत्नागिरी: रत्नागिरीतील मिरजोळे-उक्षी मार्गावर गुरुवारी सकाळी दोन बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात पटवर्धन हायस्कूल आणि महाविद्यालयातील १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एका बस चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

नेमकी घटना काय?

गुरुवारी सकाळी पावणेसात ते सातच्या सुमारास हा अपघात फणसवळे (पवार कोंड) परिसरात घडला. भावे आडोम येथून विद्यार्थ्यांना घेऊन एक बस रत्नागिरीच्या दिशेने येत होती. याच दरम्यान समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसशी तिची समोरासमोर भीषण धडक झाली. धडक इतकी तीव्र होती की बसमधील विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आणि एकच आरडाओरड झाली.

ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठे संकट टळले

अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बसमधील अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या मदतीमुळे जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करणे शक्य झाले. घटनेची माहिती मिळताच पालकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

रुग्णालयात सध्या जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, अपघातात एका बस चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसच्या सुरक्षेचा प्रश्न या अपघातामुळे पुन्हा एकदा गंभीर चर्चेत आला आहे. अरुंद रस्ते आणि वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत निष्काळजीपणा यांमुळे विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतणाऱ्या घटना वाढत आहेत. प्रशासनाने या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन ठोस उपाययोजना करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा