Thursday, July 2, 2026

Uday Samant : ठाणे अंतर्गत मेट्रोसाठी नागरिकांना विश्वासात घेणार

Uday Samant : ठाणे अंतर्गत मेट्रोसाठी नागरिकांना विश्वासात घेणार

एक महिन्याच्या आत संयुक्त बैठक घेण्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

मुंबई : ठाणे शहरासाठी प्रस्तावित असलेल्या अंतर्गत भूमिगत मेट्रो प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन करून आणि त्यांना पूर्णपणे विश्वासात घेऊनच प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिली. सभागृहात अर्धा तास चर्चेदरम्यान कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी ठाणेकरांच्या सुरक्षेचा, कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा आणि पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित करत व्यापक जनसंवादाची मागणी केली होती. यावर सरकारची सकारात्मक आणि विकासात्मक भूमिका मांडताना उद्योगमंत्री उदय सामंत(uday samant) यांनी स्पष्ट केले की, या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करतानाच वाहतूक व्यवस्थापन, कोळीवाड्यांचे सीमांकन, पुनर्वसन आणि नागरिकांना होणारा संभाव्य त्रास या सर्व संवेदनशील बाबींचा अत्यंत गांभीर्याने विचार करण्यात आला आहे.

एक महिन्याच्या आत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक

नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने निर्देश देऊन येत्या एका महिन्याच्या आत मेट्रो प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या प्रतिनिधींची एकत्रित बैठक व चर्चासत्र आयोजित केले जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्र्यांनी दिले. या चर्चेदरम्यान आमदार ॲड. निरंजन डावखरे(Ad Niranjan Davkhare) यांनी ठाणे रेल्वे स्थानक ते घोडबंदर रोड दरम्यानच्या प्रस्तावित मार्गावरील स्थानकांमुळे प्रवासाचा वेळ वाढण्याची भीती आणि जुन्या ठाण्यातील इमारतींखाली होणाऱ्या भूमिगत कामांमुळे नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेली चिंता सभागृहासमोर मांडली होती. तसेच स्थानिक नागरिक, व्यापारी आणि तज्ज्ञांसोबत स्वतंत्र बैठका घेण्याची मागणी केली होती.

नागरिकांची सुरक्षा आणि शहराचा विकास याला सर्वोच्च प्राधान्य

आमदारांच्या प्रश्नांवर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी सरकारची बाजू भक्कमपणे मांडली. ते म्हणाले की, हा प्रकल्प ठाण्याच्या भविष्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि शहराच्या शाश्वत प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रकल्प राबवताना नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि हक्कांना सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल. उद्योगमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, महायुती सरकार विकास आणि लोकसहभाग यांचा समतोल राखण्यासाठी कटिबद्ध आहे.

आगामी बैठकीत कनेक्टिव्हिटीचे सविस्तर सादरीकरण होणार

प्रस्तावित अंतर्गत मेट्रोची मुंबई मेट्रो लाईन-४ आणि उपनगरी रेल्वे व्यवस्थेशी प्रभावी एंड-टू-एंड कनेक्टिव्हिटी (End-to-End Connectivity) कशी साधली जाणार, याचे सविस्तर सादरीकरणही आगामी बैठकीत केले जाईल, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रशासनाकडून कोणालाही त्रास होणार नाही आणि सर्व घटकांचे पूर्ण समाधान केले जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी अखेरीस व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >