Saturday, June 27, 2026

समुद्रात मोती कसे बनतात ?

समुद्रात मोती कसे बनतात ?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील सुहलीला गेलेल्या मुलांच्या ज्ञानाच्या गप्पा मस्त चालू होत्या. “सागरी प्रवाह कसे होतात?” कुणालने प्रश्न केला. “एखाद्या कारणाने समुद्राच्या एका भागातील पाण्याची पातळी वाढली तर दुस­या भागातील कमी होते. असे होताच पातळी वाढलेल्या भागाकडून पातळी कमी झालेल्या भागाकडे पाणी वाहते. त्यामुळे सागरी प्रवाह निर्माण होतात. समुद्राच्या पाण्यात क्षार मिसळलेले असतात. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे प्रमाणसुद्धा कमीजास्त असते. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी समुद्राची घनता वेगवेगळी असते. जास्त घनता असलेल्या ठिकाणाहून कमी घनता असलेल्या ठिकाणाकडे पाणी वाहत जाते व समुद्रात प्रवाह निर्माण होतात. समुद्र खूप विशाल असतो. समुद्रावर सूर्याचे प्रकाश किरण जेव्हा पडतात तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी ते वेगवेगळ्या कोनातून पडतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणच्या पाण्याचे तापमान वेगवेगळे होते. पाण्याच्या तापमानात पडलेल्या फरकामुळेसुद्धा समुद्रात पाण्याचे प्रवाह तयार होतात. तसेच समुद्राच्या पृष्ठभागावरून सतत वारे वाहत असतात. निरनिराळ्या ठिकाणी ह्या वा­ऱ्यांचा वेगही निरनिराळा असतो व वा­ऱ्यांची दिशाही नेहमी बदलती असते. त्यामुळेही सागरी प्रवाह तयार होतात.” शिवमने सविस्तर स्पष्ट करून सांगितले. “मग आखाती प्रवाह म्हणजे काय आहेत?” मंगलने शंका उकरली. शिवम म्हणाला, “आखाती प्रवाह म्हणजेच समुद्रातील पाण्याचे मोठमोठे प्रवाह, सागरी प्रवाह. हा प्रवाह महासागराच्या पाण्यातून नदीसारखा वाहतो; परंतु ह्या आखाती प्रवाहाचा विस्तार खूप अफाट असतो. त्यात अनेक नद्या सहज सामावल्या जातात. ते एका सरळ रेषेत कधीच वाहत नाहीत, तर तेही जमिनीवरील नद्यांप्रमाणे सागरात वेडेवाकडे वळणे घेत वाहतात. त्याचा रंग गडद निळा असतो. तो निळा रंग महासागराच्या हिरवट किंवा राखाडी रंगाच्या पाण्यात ठळकपणे वेगळा दिसतो. ते ज्या प्रदेशातून वाहतात त्या प्रदेशाच्या हवामानावर त्यांचा परिणाम होतो. गरम प्रदेशात उगम पावणाऱ्या आखाती प्रवाहाचे पाणीही गरम असते. त्यामुळे ते वाहतात त्या प्रदेशाचे हवामानही तसेच गरम बनते.”“मुंबईची चौपाटी फारच प्रसिद्ध आहे, तर चौपाटी म्हणजे काय असते?” यात्रेकरूने विचारले.शिवम म्हणाला, “समुद्रकिनाऱ्याजवळील वाळूच्या व गुळगुळीत दगडांच्या पट्टीला चौपाटी म्हणतात, तर उथळ पाण्याच्या लांबलचक पसरलेल्या प्रदेशाला दलदलीचा प्रदेश म्हणतात.”“मुलांनो समुद्राला रत्नाकर किंवा रत्नांचा सागर का म्हणतात हे माहीत आहे का तुम्हाला?” त्या यात्रेकरूने विचारले.“हो काका. ह्या पुस्तकात सारी माहिती आहे. मी ती कालच वाचली आहे.” शिवम म्हणाला, “समुद्रात विविध खनिजांपासून पाचू, माणिक, नीलमणी अशी रत्ने बनतात. समुद्री शिंपल्यांत मोती बनतात.” “ ही सारी रत्ने अलंकारांत, दागिन्यांमध्ये कामी येतात.”यात्रेकरू बोलला. “हो काका.” शिवम त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देत बोलला, “म्हणूनच समुद्राला रत्ने निर्माण करणारा म्हणजे रत्नाकर असे म्हणतात.”“ बरे समुद्रात मोती कसे बनतात?” यात्रेकरूने प्रश्न केला.“त्याचे असे आहे काका,” शिवम् म्हणाला, “समुद्रात तयार होणाऱ्या शिंपल्यामध्ये आयस्टर नावाचा किडा असतो. त्याच्या शरीरात किंवा त्याभोवतीच्या शिंपल्यात जर एखादाही रेतीचा कण घुसला तर तो कण त्या किड्याला टोचू लागतो. त्यामुळे तो किडा त्या कणाभोवती त्याच्या लाळेचे वेष्टन चढवितो. किडा त्या वेष्टनाला गुळगुळीत बनवितो. शिंपल्यात फिरून फिरून ते कणाचे वेष्टन गोल बनते. त्या कणवेष्टनाचाच मोती बनतो. तो खूप चमकदार व सुंदर असतो.मोती रंगाने पांढरा, पिवळा, गुलाबी किंवा काळा असतो. नैसर्गिक मोती खूप महाग असतात. आजकाल कृत्रिम रीतीने मोती तयार करतात. त्यासाठी आयस्टरच्या कवचाच्या आत वाळूच्या कणाचा शिरकाव केला जातो. २-३ वर्षांनी आत मोती तयार झालेला असतो.”

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा