Saturday, June 27, 2026

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या विमानसेवेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून जवळपास प्रत्येक उड्डाण पूर्ण क्षमतेने होत असून, आगामी १५ जुलैपर्यंत तब्बल ८० टक्के तिकिटांचे आगाऊ आरक्षण झाले आहे. विशेष म्हणजे पर्यटनासाठी तुलनेने कमी गर्दीच्या मानल्या जाणाऱ्या या हंगामातही गोवा मार्गावरील विमानसेवा हाऊसफुल होत असल्याने हा प्रतिसाद विक्रमी मानला जात आहे.

जळगाव विमानतळावरून (Jalgaon Airport) प्रादेशिक हवाई संपर्क (आरसीएस) योजनेअंतर्गत फ्लाय ९१ कंपनीकडून गोवा, पुणे आणि हैदराबाद या मार्गांवर नियमित विमानसेवा सुरू आहे. यामध्ये गोवा मार्गाला सर्वाधिक पसंती मिळत असून, जून महिन्यातील बहुतांश उड्डाणे पूर्ण प्रवासी क्षमतेने झाली आहेत. विमान कंपनीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील पंधरा दिवसांपर्यंतही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

देशांतर्गत पर्यटनाकडे नागरिकांचा कल

अलीकडच्या काळात परदेश दौऱ्यांपेक्षा देशांतर्गत पर्यटनाकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विदेशी चलनाची बचत करण्याचे पंतप्रधानांनी केलेले आवाहनही अनेकांनी गांभीर्याने घेतले असून, यंदा परदेशाऐवजी देशातील लोकप्रिय पर्यटनस्थळांना प्राधान्य दिले जात आहे. त्याचा थेट फायदा गोव्यासारख्या पर्यटनस्थळांना होत असल्याचे पर्यटन क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

शॉर्ट ट्रिपसाठी विमान प्रवासाला पसंती

जळगावातील ट्रॅव्हल एजन्सी (Travel Agency) आणि पर्यटन व्यावसायिकांच्या माहितीनुसार, गोवा टूरच्या (Goa Tour)चौकशीत आणि बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. आयटी क्षेत्रातील कर्मचारी, तरुण वर्ग, नवविवाहित जोडपी तसेच कुटुंबीय विकेंड किंवा दोन-तीन दिवसांच्या सुट्टीत गोव्याचा बेत आखत आहेत. रेल्वे किंवा रस्ते मार्गाने प्रवास करण्यापेक्षा विमानाने अवघ्या काही तासांत गोव्यात पोहोचता येत असल्याने वेळेची मोठी बचत होत आहे. त्यामुळे विमान प्रवासाला अधिक पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.

अधिक विमानफेऱ्यांची मागणी

गोवा मार्गावरील सातत्याने वाढणारा प्रतिसाद लक्षात घेता भविष्यात या मार्गावर अतिरिक्त विमानफेऱ्या सुरू कराव्यात किंवा मोठ्या क्षमतेची विमाने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. जळगाव विमानतळावरील वाढती प्रवासी संख्या ही विमानसेवेच्या विस्तारासाठी सकारात्मक बाब मानली जात असून, आगामी पर्यटन हंगामातही हा उत्साह कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तिकीट दरही वाढले

प्रवाशांची वाढती गर्दी तिकीट दरांवरही दिसून येत आहे. आरसीएस योजनेअंतर्गत पूर्वी सुमारे अडीच हजार रुपयांपासून उपलब्ध होणारे तिकीट आता चार हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तर शनिवार-रविवार किंवा सलग सुट्ट्यांच्या काळात हेच तिकीट सात हजार रुपयांपर्यंत जात आहे. दर वाढले असले तरी पर्यटक आगाऊ आरक्षण करून गोव्याचा बेत निश्चित करत असल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >