Saturday, June 27, 2026

Eknath Shinde: रायगड किल्ल्यावरील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणार

Eknath Shinde: रायगड किल्ल्यावरील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

मुंबई : “रायगडावर पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी गडावरील पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देऊ”, अशी घोषणा उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली. यासोबतच यंदा पावसाने काहीशी ओढ दिली असली, तरी अवघड परिस्थिती आल्यास महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकणकडा मित्र मंडळ यांनी तिथीप्रमाणे आयोजित केलेल्या शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी शिंदे शनिवारी रायगडावर उपस्थित होते. त्यावेळी बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली. यासोबतच लाडकी बहिण योजनेचे पैसे कधीही बंद होणार नाहीत याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. शिंदे (Shinde)म्हणाले, हा रायगड नुसता दगड धोंड्याचा किल्ला नाही, तर आपल्या स्वाभिमानाचा कणा आहे. इथे उभे राहिले की अंगावर रोमांच उभे राहतात, छाती अभिमानाने फुलून येते, जेव्हा या मातीमध्ये ३५३ वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा(Chatrapti Shivaji Maharaj) राज्याभिषेक झाला तेव्हा काय आनंदोत्सव साजरा झाला असेल. तो सोहळा डोळे दिपवून टाकणारा असेल त्यामुळेच आपण हा दिवस तिथीप्रमाणे साजरा करतो.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे(BalasahebThackeray) यांनी तिथीप्रमाणे हा सोहळा साजरा करा, असे सांगितले होते. मात्र तारखेप्रमाणेही इथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा नुकताच साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे महत्त्व असे आहे की तो कितीही वेळा साजरा केला तरीही त्याला येण्यासाठी शिवभक्तांचा उत्साह कमी पडणार नाही. मंत्री भरत गोगावले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ३० वर्षापूर्वी हा सोहळा आयोजित करायला सुरवात केली. त्यात सहभागी होणाऱ्या शिवभक्तांची संख्या वर्षागणिक वाढत गेली. रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकणकडा मित्र मंडळ यांनी हा सोहळा आयोजित करायला सुरुवात केली, आणि शासनाने या आयोजनाला राजमान्यता दिली. आता हा उत्सव महोत्सव म्हणून नावारूपाला आला असल्याचे शिंदे यांनी सांगितले. याच मातीत आपल्या राजाने हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकवला, याच मातीत मराठा साम्राज्य जन्माला आले, आज मराठी अस्मितेचा हुंकार दाही दिशांना दुमदुमला आहे. ३५३ वर्षापूर्वी आजच्याच तिथीला शिवाजी महाराज हे छत्रपती झाले, मराठी मनांचे राजे झाले. शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे पारतंत्र्यात पिचलेल्या मराठी जनतेला सार्वभौम राजा मिळाल्याची ती एक ऐतिहासिक घटना होती. आजचा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी स्वराज्य स्वधर्म आणि लोककल्याण या कर्तव्याचे स्मरण करून देणारा आहे. आजच्या दिवशी आपले राजे फक्त सिंहासनावर बसले नाही तर जनतेच्या काळजात जाऊन बसले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार

- महाराजांनी कधी जात पात पाहिली नाही, माणूस पहिला दीनदुबळ्यांचे कल्याण एवढाच त्यांचा ध्यास होता. महिलांचा सन्मान कसा ठेवायचा ते शिकवले आहे. त्यामुळे त्यांचे जगणे आजही आपल्याला आदर्शवत आहे. त्यांचे आरमार, युद्धनीती, न्यायव्यवस्था, पर्यावरणाचा विचार हे सगळे आजही आपल्याला दिशा देत आहेत. - मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi)यांना धन्यवाद देतो की छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा त्यांनी नौदलाच्या नवीन लोगोमध्ये अंतर्भूत केली आहे. या कृतीद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती सातासमुद्रापार पोहोचली आहे. - माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मी शिवसृष्टीला मान्यता दिली. आज देवेंद्रजींच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात हे काम पुढे चालू आहे. रायगड किल्यासह राज्यातील १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. छत्रपतींचं कार्य यानिमित्ताने जगभरात पोहचत आहे ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे यावेळी आवर्जून नमूद केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >