Thursday, June 25, 2026

3 Idiots 2 Update : 17 वर्षांनंतर पुन्हा रंगणार मैत्रीचा प्रवास ? रँचो, फरहान आणि राजूच्या पुनरागमनाबाबत राजकुमार हिरानींचा मोठा खुलासा

3 Idiots 2 Update : 17 वर्षांनंतर पुन्हा रंगणार मैत्रीचा प्रवास ? रँचो, फरहान आणि राजूच्या पुनरागमनाबाबत राजकुमार हिरानींचा मोठा खुलासा

3 Idiots 2 Update : ‘3 इडियट्स' प्रदर्शित होऊन १७ वर्ष झाली असली तरी आजही प्रेक्षकांच्या मनात आजही चित्रपट घर करून आहे. बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय आणि काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेल्या चित्रपटांमध्ये ‘3 इडियट्स’ हा एक चित्रपट आहे. ‘3 इडियट्स’च्या पहिल्या भागात आमिर खानने रँचो, आर. माधवनने फरहान आणि शरमन जोशीने राजू ही पात्रे साकारली होती. याशिवाय करीना कपूर खान, बोमन इराणी, ओमी वैद्य आणि मोना सिंग यांच्या भूमिकांनाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आजही या चित्रपटातील संवाद, गाणी आणि प्रसंग सोशल मीडियावर चर्चेत असतात.

सुमारे 55 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 200 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. तर जगभरात 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवत त्या काळातील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला होता. केवळ व्यावसायिक यशच नव्हे, तर आशयघन कथानकामुळेही या चित्रपटाला विशेष लोकप्रियता मिळाली. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली नव्हती, तर शिक्षण पद्धती, करिअरची निवड, मैत्री आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावर प्रभावी भाष्य करत संपूर्ण पिढीच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यामुळे तेव्हापासूनच चाहते ‘3 इडियट्स' 2 ची आतुरतेने वाट पाहत आहे.

राजकुमार हिरानींचा मोठा खुलासा

आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तब्बल 17 वर्षांनंतर ‘3 इडियट्स’चा सिक्वेल मोठ्या पडद्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली असून दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत राजकुमार हिरानी यांनी ‘3 इडियट्स 2’ संदर्भातील चर्चांना दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, चित्रपटाच्या सिक्वेलसाठी प्राथमिक स्तरावर काम सुरू असून कथा आणि पटकथेवर सध्या गंभीरपणे विचार सुरू आहे. विशेष म्हणजे, पहिल्या भागातील सर्वात लोकप्रिय पात्रे असलेले रँचो, फरहान आणि राजू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

'त्या' ३ मित्रांचा पुढील प्रवास

‘3 इडियट्स' पहिल्या भागात आयआयटीसारख्या प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन मित्रांची कहाणी होती. शिक्षणाच्या दबावाखाली जगणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना, संघर्ष आणि स्वप्नांना मिळालेली दिशा यामुळे हा चित्रपट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांच्या मनाला भिडला. मात्र, सिक्वेलमध्ये कथा कॉलेजच्या दिवसांभोवती फिरणार नसून या तिघांच्या पुढील आयुष्याचा प्रवास दाखवला जाणार आहे. राजकुमार हिरानी यांच्या म्हणण्यानुसार, ‘3 इडियट्स 2’ मध्ये मोठा टाइम लीप असणार आहे. पहिल्या भागातील घटनांनंतर जवळपास दोन दशके उलटल्यानंतर या तिन्ही मित्रांच्या आयुष्यात काय बदल झाले, त्यांची स्वप्ने कितपत पूर्ण झाली, त्यांनी कोणत्या आव्हानांचा सामना केला आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडले, हे या कथेतून उलगडले जाणार आहे.

सध्या चित्रपटाच्या पटकथेवर लेखक अभिजात जोशी यांच्यासोबत काम सुरू आहे. हिरानी यांनी सांगितले की, सुरुवातीचा कथानकाचा मसुदा अभिनेता आमिर खान यांना ऐकवण्यात आला असून त्यांनाही ही कल्पना आवडली आहे. मात्र, अंतिम पटकथा तयार होण्यासाठी अद्याप काही काळ लागणार आहे. पुढील दोन महिन्यांत कथानक अधिक स्पष्ट होईल आणि त्यानंतर चित्रपटाच्या निर्मितीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

दरम्यान, ‘3 इडियट्स 2’ बाबतची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी रँचो, फरहान आणि राजू यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या तिघांच्या मैत्रीचा पुढचा अध्याय नेमका कसा असेल, याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

जर सर्व काही नियोजनानुसार झाले, तर येत्या काही वर्षांत प्रेक्षकांना ‘3 इडियट्स 2’च्या माध्यमातून पुन्हा एकदा मैत्री, स्वप्ने आणि आयुष्याचा नवा प्रवास अनुभवायला मिळू शकतो. त्यामुळे या चित्रपटाच्या अधिकृत घोषणेकडे आता संपूर्ण बॉलिवूड आणि चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >