Friday, June 19, 2026

Ramdas Kadam : 'उबाठा'चा सातवा खासदारही फुटलाय !

Ramdas Kadam : 'उबाठा'चा सातवा खासदारही फुटलाय !

रामदास कदम; बंडखोरांच्या पत्रावर सही झाल्याचा दावा

मुंबई : 'ऑपरेशन टायगर' (Operation Tiger)च्या माध्यमातून उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्याची घटना ताजी असतानाच, आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam)यांनी आणखी खळबळजनक दावा केला आहे. "उद्धवजी, तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला अंधारात ठेवून सतत फसवत आहेत. उबाठाचे ६ नव्हे, तर ७ खासदार फुटले असून त्या सातव्या खासदाराची सही देखील बंडखोरांच्या पत्रावर झाली आहे. हा खासदार सध्या तुमच्या अगदी बाजूलाच बसतो आणि आमच्याकडे केंद्रीय मंत्रीपद मागत आहे," असा दावा रामदास कदम यांनी केला.

शिवसेनेच्या (Shivsena) वर्धापनदिनानिमित्त जुन्या आठवणींना उजाळा देत रामदास कदम भावुक झाले. ते म्हणाले, "माझ्या डोळ्यांसमोर आजही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उभे राहतात. चातक जसा पावसाची वाट पाहतो, तसे लाखो शिवसैनिक साहेबांच्या विचारांची वाट पाहायचे. दुर्दैवाने आज साहेब आपल्यात नाहीत. साहेबांनी स्वतः कधीही कोणतेही शासकीय पद, आमदारकी किंवा मुख्यमंत्रीपद घेतले नाही. त्यांनी रिमोट कंट्रोल स्वतःकडे ठेवून सामान्य कार्यकर्त्यांना पदे दिली, त्यांचा सन्मान केला. मनोहर पंत असोत की नारायण राणे, साहेबांच्या एका शब्दावर सगळे जीव द्यायला तयार असायचे. आज मराठी माणूस ताठ मानेने जगतोय तो केवळ बाळासाहेबांमुळेच. मात्र, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना अनुसरले नाही, अन्यथा आज शिवसेना देशात नंबर एकचा पक्ष असती."

">कदम यांनी सांगितले की, "उद्धव ठाकरे(Udhav Thackarey) यांनी स्वतः 'मातोश्री'च्या बाहेर पडून मैदानात यायला हवे. एकनाथ शिंदे हे कार्यपद्धतीमुळे खूप पुढे गेले आहेत. जेव्हा तुम्ही शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेससोबत गेलात, तेव्हाच बाळासाहेबांचे विचार बुडाले. जर आमदारांना, खासदारांना त्यांच्या भागात काम करण्यासाठी निधीच मिळणार नसेल, तर त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल ना? मग निधीसाठी ते विकासासोबत म्हणजेच एकनाथ शिंदेंसोबत नक्कीच येतील. मुंबईचे २५ नगरसेवक सध्या आमच्या संपर्कात आहेत आणि मी आज आमदारांवर जास्त बोलणार नाही, पण उबाठाचे उरलेले आमदारही २०२९ पर्यंत उद्धव ठाकरेंजवळ शिल्लक राहणार नाहीत", असाही दावा त्यांनी केला.

आदित्यसाठी पक्षाची वाट लावली

रामदास कदम म्हणाले, "बाळासाहेब कोणतीही बैठक घेताना सर्वांची मते जाणून घ्यायचे आणि मग निर्णय घ्यायचे. उद्धवजी, आपण कधी नेत्यांच्या बैठका घेतल्यात का? ६ खासदार बाहेर पडले, यापूर्वी १० मोठे नेते मंत्रीपदे सोडून बाहेर गेले. गुलाबराव पाटील यांनी २० आमदारांसह हात जोडून विनंती केली होती, तेव्हा तुम्ही त्यांना सरळ 'गेट आऊट' केले. लोक का सोडून जात आहेत, याचे आत्मपरीक्षण करा. फक्त आदित्य ठाकरेंसाठी तुम्ही पक्षाची वाट लावली आहे. आदित्य जेव्हा माझ्या चेंबरमध्ये यायचे, तेव्हा मी ज्येष्ठ असूनही उठून उभा राहायचो, त्यांना खुर्ची द्यायचो. पण मला काय माहीत, ते माझेच मंत्रीपद हिरावून घेतील! आमचे मंदिर असलेल्या 'मातोश्री'ची आज ही अवस्था का झाली, याचे प्रचंड दुःख होते," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा