Wednesday, June 17, 2026

Nashik : भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी

Nashik : भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी

Nashik : नाशिक-पुणे महामार्गावर कामत हॉटेलसमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला असून त्यांच्या पतीवर गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत. धडक दिल्यानंतर अपघातग्रस्त वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याने पोलिसांनी अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

रविवारी (दि. १४) मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. सुनंदा गणेश ढाके (वय ५८, रा. श्रीनिवास कोर्ट, आर्टिलरी सेंटर रोड, नाशिकरोड) यांचा या अपघातात मृत्यू झाला, तर त्यांचे पती गणेश मुरलीधर ढाके (वय ६३) गंभीर जखमी झाले आहेत.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश ढाके हे पत्नी सुनंदा यांच्यासह मोटारसायकल (एमएच १५ एफएल ८०२८) वरून द्वारका परिसरातून नाशिकरोडकडे जात होते. त्यांची दुचाकी नाशिक-पुणे महामार्गावरील (Nashik-Pune Highway) कामत हॉटेलसमोर पोहोचली असता, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की, ढाके दाम्पत्य रस्त्यावर फेकले गेले आणि दुचाकीच्या मागील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

अपघातानंतर संबंधित वाहनचालक मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, त्याच मार्गावरून जात असलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी भोसले आणि त्यांच्या मित्रांनी तत्परता दाखवत जखमींना मदत केली. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना सुनंदा ढाके यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ढाके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुसरीकडे, गणेश ढाके यांच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी मृत महिलेची मुलगी छाया लोमेश भोगे (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे फरार वाहनचालकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा नाशिक-पुणे महामार्गावरील भरधाव वाहनचालकांचा बेफिकीरपणा समोर आला असून, अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या चालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा