Wednesday, June 17, 2026

Nashik Water Crisis : नाशिककरांनो लक्ष द्या ! जून-जुलैत आठवड्याच्या 'या' दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार; पाणी बचतीसाठी पालिकेचा मोठा निर्णय

Nashik Water Crisis : नाशिककरांनो लक्ष द्या ! जून-जुलैत आठवड्याच्या 'या' दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार; पाणी बचतीसाठी पालिकेचा मोठा निर्णय

Nashik Water Crisis : नाशिककरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पाण्यासंदर्भात ही महत्त्वाची बातमी आहे. यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संभाव्य पाणीटंचाईचे संकट ओळखून नाशिक महानगरपालिकेने पाणी बचतीसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. जून आणि जुलै २०२६ महिन्यात शहरातील प्रत्येक शनिवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

अल-निनोचे संकट

भारतीय हवामान विभागाने अल-निनो परिस्थितीचा प्रभाव यापूर्वीच राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता असून भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी राज्याच्या जलसंपदा विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार महापालिकेने विशेष कृती आराखडा तयार केला आहे. सध्या नाशिक शहराला गंगापूर धरण समूह, दारणा धरण समूह आणि मुकणे धरणातून दररोज सुमारे ६०० दशलक्ष लिटर कच्च्या पाण्याचा पुरवठा केला जातो. हे पाणी शहरातील सात जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये प्रक्रिया करून १३४ जलकुंभ आणि तब्बल २५०२ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवले जाते.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, १५ ऑक्टोबर २०२५ ते १४ जून २०२६ या कालावधीत एकूण ६४०० दशलक्ष घनफूट आरक्षित पाण्यापैकी ५१३३.९९ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. सध्या केवळ १२६६.०१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असून दररोजच्या सरासरी वापरानुसार हा साठा फक्त ६० दिवस पुरेल इतकाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ऑगस्ट अखेरपर्यंतचा कालावधी पाहता अजून ७८ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे सुमारे १८ दिवसांच्या पाणीटंचाईची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी पाणी बचतीचा आराखडा राबविण्यात येणार आहे.

ऑगस्ट महिन्यातही यादिवशी पाणीपुरवठा बंद

या नियोजनानुसार जून महिन्यातील उर्वरित दोन शनिवार आणि जुलै महिन्यातील सर्व चार शनिवार शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याशिवाय ऑगस्ट महिन्यातही पाणी बचतीसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या असून १, ४, ७, १०, १३, १६, १९, २२, २५, २८ आणि ३१ ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाणी वाया जाऊ देऊ नये आणि महापालिकेच्या या निर्णयाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, पावसाची प्रतीक्षा वाढत असताना नाशिककरांना आता नियोजित पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पाणी साठवणूक आणि वापराबाबत अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा