Monday, June 15, 2026

Ramdas Athawale : तृणमूलच्या उर्वरित खासदार आणि आमदारांनी रिपब्लिकन पक्षात यावे!

Ramdas Athawale : तृणमूलच्या उर्वरित खासदार आणि आमदारांनी रिपब्लिकन पक्षात यावे!
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन; राजकीय भविष्याचा विचार करून आंबेडकरी विचार निवडावा मुंबई : "तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी बंडखोरी करून त्रिपुरातील 'नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया'मध्ये प्रवेश केला आहे. या खासदारांच्या बंडखोरीची पूर्वकल्पना असती, तर त्यांना रिपब्लिकन पक्षात येण्याचे आवाहन केले असते. मात्र, आता तृणमूलच्या उर्वरित खासदार आणि बंडखोर आमदारांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष असलेल्या आरपीआयमध्ये सामील व्हावे", असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमवारी केले.
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील दबावामुळे आतापर्यंत पक्षातील खासदार बंड करण्यास धजावत नव्हते. मात्र, आता सत्ता गेल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाला कंटाळलेल्या लोकप्रतिनिधींनी त्यांचे नेतृत्व नाकारले आहे, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवले म्हणाले, "तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व झुगारून त्रिपुरातील नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात प्रवेश केला आहे. तृणमूलचे खासदार बंड करणार आहेत, हे जर मला आधी कळले असते, तर ते सर्व खासदार माझ्या ओळखीचे असल्याने मी त्यांना रिपब्लिकन पक्षात येण्याचे आवाहन केले असते." २० खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर आता उर्वरित तृणमूलच्या खासदारांनी रिपब्लिकन पक्षात यावे, असे आवाहन त्यांनी केले.
६० बंडखोर आमदारांनाही निमंत्रण खासदारांपाठोपाठ पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या ६० आमदारांनीही ममता बॅनर्जींचे नेतृत्व झुगारून बंड केले असून त्यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. या आमदारांचा उल्लेख करत आठवले म्हणाले की, तृणमूल काँग्रेसविरुद्ध बंडखोरी केलेल्या आमदारांनीही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार डोळ्यांसमोर ठेवून रिपब्लिकन पक्षात प्रवेश करावा.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा