Sunday, June 14, 2026

Mumbai pune housing projects : महामुंबईतील २ लाख घरांचे स्वप्न 'रखडणार'? युद्धामुळे बांधकाम क्षेत्रासमोर मोठे संकट

Mumbai pune housing projects : महामुंबईतील  २ लाख घरांचे स्वप्न 'रखडणार'? युद्धामुळे बांधकाम क्षेत्रासमोर मोठे संकट

Mumbai : चालू वर्षात आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो घरखरेदीदारांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसला असून, २०२६ मध्ये पूर्णत्वास येणाऱ्या देशभरातील ५ लाख ४० हजार घरांच्या ताबा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

५७ टक्के घरे मुंबई आणि पुण्यातील

मालमत्ता बाजारपेठेतील आघाडीची सल्लागार कंपनी 'ॲनरॉक'च्या (Anarock) ताज्या अहवालानुसार, यावर्षी देशभरात विक्रमी ५ लाख ४० हजार ४०० घरे पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, युद्धाच्या सावलीमुळे प्रकल्पांना विलंब होण्याची दाट शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील ५७ टक्के घरे एकट्या महाराष्ट्र म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि पुण्यातील आहेत.

क्षेत्रनिहाय रखडणाऱ्या घरांची आकडेवारी:

मुंबई महानगर प्रदेश (महामुंबई): २ लाख ७ हजार ३०० घरे

पुणे: १ लाख ३०० घरे

युद्धाचा फटका आणि बांधकाम क्षेत्रापुढील आव्हाने

ॲनरॉक'च्या अहवालानुसार, मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्याचा थेट परिणाम बांधकाम साहित्यावर झाला आहे:

साहित्याचा तुटवडा: सिमेंट, स्टील आणि लोखंड यांसारख्या अत्यावश्यक बांधकाम साहित्याची वाहतूक मंदावली आहे.

किमतींत वाढ: साहित्याच्या तुटवड्यामुळे दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

वाहतूक खर्चाचा भार: इंधनाच्या तुटवड्यामुळे मालवाहतुकीचे दर वाढले आहेत, ज्याचा प्रकल्पाच्या एकूण खर्चावर (Cost of Project) परिणाम होत आहे.

इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची भीती

२०२० मधील कोरोना संकटाची आठवण करून देताना अहवालात म्हटले आहे की, त्यावेळीही ४ लाख ६६ हजार घरांचे वितरण नियोजित होते, पण प्रत्यक्षात केवळ ४६ टक्केच घरे पूर्ण होऊ शकली होती. सध्याची युद्धजन्य परिस्थिती पाहता, यंदाही अशीच बिकट परिस्थिती ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ॲनरॉकचे संशोधन-सल्लागार विभागाचे प्रमुख आणि कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केले की, हे वर्ष बांधकाम क्षेत्रासाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहे. हे युद्ध लवकर न संपल्यास, घरांचा ताबा मिळण्यास विलंब होण्याचे प्रमाण वाढू शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >