Friday, June 12, 2026

Jalgaon News : अनधिकृत विक्रेत्यांचे धाबे दणाणले; 305 जण रंगेहात ताब्यात

Jalgaon News : अनधिकृत विक्रेत्यांचे धाबे दणाणले; 305 जण रंगेहात ताब्यात

Jalgaon News : रेल्वे प्रवास करताना रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विक्रेते (Food vendors) येत असतात. यातील बऱ्याच जणांकडे परवाना नसतो. अशावेळेस अनेकदा हे अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते (Unauthorized food vendors) प्रवाशांच्या आरोग्याशी खेळतात. याच विनापरवाना घुसखोरी करणाऱ्या अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

भुसावळ रेल्वे विभागाच्या (Bhusawal Railway Division) वाणिज्य शाखा आणि रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) संयुक्त 'सर्जिकल स्ट्राईक' करत तब्बल ३०५ अनधिकृत विक्रेत्यांना रंगेहात पकडले आहे. गेल्या १५ दिवसांपासून ही कारवाई सुरु आहे. या धडक मोहिमेमुळे रेल्वे स्थानक आणि गाड्यांमधील अनधिकृत फेरीवाल्यांचे धाबे दणाणले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६७ जणांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल ९७ हजार ९५० रुपये दंड वसुलण्यात आला आहे.

तीन रेल्वे मार्गांवर 'क्लीन स्वीप'

भुसावळ रेल्वे प्रशासनाने (Bhusawal Railway Administration) दिलेल्या माहितीनुसार, २८ मे ते १० जून या कालावधीत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. प्रवाशांच्या आरोग्याशी होणारा खेळ लक्षात घेता त्यासोबतच प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे हा यामागचा मुख्य हेतू होता. या मोहिमेत मुख्यत्वे तीन रेल्वे कॉरिडोअर्सवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. यामध्ये भुसावळ – खंडवा विभाग (Bhusawal – Khandwa Section), भुसावळ – नाशिक विभाग (Bhusawal – Nashik Division), भुसावळ – बडनेरा विभाग (Bhusawal – Badnera Section)  या मार्गांवर धावणाऱ्या एक्स्प्रेस आणि प्रमुख स्थानकांवर आरपीएफच्या जवानांनी आणि वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून या अनधिकृत विक्रेत्यांची धरपकड केली.

'१३९' वर करा थेट तक्रार

प्रवाशांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत केवळ अधिकृत आणि परवानाधारक स्टॉल्स किंवा विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थांची खरेदी करावी. प्रवासात कुठेही खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका आल्यास किंवा अनधिकृत विक्री आढळल्यास तात्काळ रेल्वेच्या १३९ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा 'रेलमदद' पोर्टलवर तक्रार नोंदवावी. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, रेल्वे प्रवाशांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असून, अशी कारवाई भविष्यातही आणखी तीव्रतेने सुरूच राहील, असा थेट इशारा भुसावळ रेल्वे प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे अनधिकृत विक्रेत्यांना मोठा झटका बसला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >