Wednesday, June 10, 2026

Deputy CM Eknath Shinde : ठाकरे गटाला वरळीत मोठा धक्का; दिग्गज पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश!

Deputy CM Eknath Shinde : ठाकरे गटाला वरळीत मोठा धक्का; दिग्गज पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश!

Mumbai : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाला वरळीसह राज्यभरातून मोठे खिंडार पडले आहे. मुंबई, नांदेड, सोलापूर, पालघर, सातारा आणि ठाणे जिल्ह्यातील विविध पक्षांचे महत्त्वाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईतील ‘नंदनवन’ निवासस्थानी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेवर जनतेचा विश्वास दृढ: एकनाथ शिंदे

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. ते म्हणाले, “राज्यभरातून शिवसेनेत सुरू असलेला पक्षप्रवेश हा पक्षाच्या विचारसरणीवर आणि नेतृत्वावर असलेल्या वाढत्या विश्वासाचा पुरावा आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण घेऊन, ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या मूलमंत्रावर वाटचाल करत आहे. विकासकामांवर आधारित आमचे राजकारण जनतेला भावत आहे.”

ठाकरे गटाला वरळीत मोठा फटका

या पक्षप्रवेश सोहळ्यात विशेषतः वरळीतील ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा समावेश आहे. ज्या प्रमुख नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यामध्ये:

  • वरळी (मुंबई): शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी, उपशाखा संघटक मीना पाथरे, रजनी कोळी आणि प्रतिभा दळवी.

  • नांदेड: रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे.

  • सोलापूर: राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि अखिल भारतीय कैकाडी समाजाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश हसापूरे.

  • पालघर: ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागप्रमुख प्रवीण गवळी, संतोष महाले, योगेश भानुशाली आणि मालती गवळी.

  • ठाणे: राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष राम बनसोडे आणि कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष भैरवनाथ वाघमारे.

  • सातारा: कराड येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते.

यासोबतच विविध जिल्ह्यांतील अनेक सरपंच, उपसरपंच आणि स्थानिक कार्यकर्त्यांनीही हाती भगवा झेंडा घेतला.

विकासाला प्राधान्य आणि मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक

मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले की, “निवडणुका नसतानाही लोक मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करत आहेत, हे आमच्या विकासकामांच्या यशाचे द्योतक आहे. नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांच्या भागातील विकास प्रकल्पांना प्राधान्य दिले जाईल.”

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचेही त्यांनी विशेष कौतुक केले. पंतप्रधान मोदी सलग १२ वर्षे देशसेवेचा महत्त्वाचा टप्पा गाठत आहेत, हे देशाच्या इतिहासातील अभिमानास्पद असल्याचे सांगत, केंद्र आणि राज्यातील ‘डबल इंजिन’ सरकारमुळेच महाराष्ट्राच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळाल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

Comments
Add Comment