Thursday, June 4, 2026

Minister Uday Samant : महायुतीत समन्वयातून निवडणूक लढवणार - मंत्री उदय सामंत

Minister Uday Samant : महायुतीत समन्वयातून निवडणूक लढवणार - मंत्री उदय सामंत

Nashik Vidhan Parishad Election : आगामी निवडणूक महायुतीने एकत्रितपणे आणि समन्वयातून लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजप तसेच राष्ट्रवादीतील काही इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले, तरी महायुतीविरोधात ज्या ठिकाणी अन्य समाजातील उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, ते अर्ज मागे घेण्यासाठी वरिष्ठ नेत्यांमार्फत प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत स्पष्ट सूचना दिल्याचे सामंत यांनी नमूद केले.

चर्चा करून योग्य तो मार्ग काढणार

गोकुळ गीते (Gokul Gite) प्रकरणावर बोलताना सामंत म्हणाले की, गीते बंधूंच्या विषयात मंत्री गिरीश महाजन पुढाकार घेत असून त्यांच्यावर सर्वांचा विश्वास आहे. समन्वयातून चर्चा करून योग्य तो मार्ग काढला जाईल आणि त्यामुळे नरेंद्र दराडे यांचा विजय निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुतीतील कोणताही नेता नाराज नसल्याचा दावा करत सामंत यांनी सांगितले की, तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली असून निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचे ठरले आहे. सुहास कांदे नाराज नसून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. गीते बंधूंचा प्रश्नही गिरीश महाजन सोडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गणेश गीते यांची आपण भेट घेणार असल्याचे सांगत सामंत म्हणाले की, ते सध्या मुंबईत आहेत आणि गिरीश महाजन यांनी त्यांना मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी नेल्याची माहिती आहे. ठाकरे गटावर टीका करताना सामंत म्हणाले की, संजय राऊत सातत्याने शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. मात्र शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची मते एकत्र आल्यास महायुतीचा विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला.

छगन भुजबळ यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सामंत म्हणाले की, राजकारण प्रत्येक ठिकाणी वेगळे असते. पक्षाच्या उमेदवारासाठी गरज पडल्यास भुजबळ यांच्याकडे जाण्याची तयारी सुहास कांदे यांनीही दर्शवली आहे. त्यामुळे महायुतीतील सर्व नेते या निवडणुकीत एकत्र दिसतील, असे त्यांनी सांगितले.

आमच्यात कुणीही नाराज नाही

पदाधिकाऱ्यांमधील नाराजीबाबत बोलताना सामंत यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेत पक्षप्रमुखांचा आदेश अंतिम मानला जातो. महायुतीमध्ये समन्वय समिती असून त्यामार्फत चर्चा करून मार्ग काढला जातो. गिरीश महाजन हे या समितीमध्ये सक्रिय असून महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी ते सकारात्मक पावले उचलतील, असे त्यांनी सांगितले. माविआवर निशाणा साधताना सामंत म्हणाले की, घोडेबाजाराचा आरोप करणाऱ्यांनी सर्वत्र उमेदवारी अर्ज मागे घ्यायला हवेत. "आम्हाला मातोश्रीवर जाण्याची गरज नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आहोत," असेही त्यांनी स्पष्ट केले.

"आमच्यात कुणीही नाराज नाही आणि नरेंद्र दराडे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील," असा विश्वास व्यक्त करत सामंत यांनी सांगितले की, पक्षप्रमुखांनी दिलेला शब्द पाळला आहे. सुहास कांदे हे आदेश पाळणारे नेते असून त्यांनी कधीही काही मागितले नाही, असेही ते म्हणाले. पालकमंत्री पदाबाबत बोलताना त्यांनी रायगड जिल्ह्यात भरत गोगावले यांनीच पालकमंत्री व्हावे, ही आमची भूमिका असल्याचे सांगितले. याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा