Sunday, May 31, 2026

Pooja Bhatt : पूजा भटनं सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण, म्हणाली.......

Pooja Bhatt : पूजा भटनं सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण, म्हणाली.......

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट करिअरपेक्षा तिच्या पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली आहे. अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक दिग्दर्शिकाही होती. पण, तिचं वैयक्तिक आयुष्य कायमच वादग्रस्त राहिलं. आता पूजाने तिचा एक्स पती मनीष मखिजा (Manish Makhija) याच्यापासून विभक्त होण्यामागचं कारण उघड केलं आहे. एका मुलाखतीत बोलताना तिने सांगितलं की, तिच्या संसारात भांडणं किंवा वाद नव्हते, पण तिला कधीच आई होण्याची इच्छा नव्हती आणि हेच तिच्या घटस्फोटाचे एक प्रमुख कारण ठरले.

आई न होण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल बोलताना पूजा म्हणाली, "माझं वैवाहिक जीवन सुखी नसण्यामागील एक मोठं कारण म्हणजे मला मुलं नको होती. मला मुलं खूप आवडतात, पण आई बनण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात कधीच निर्माण झाली नाही. वयाच्या ३० व्या वर्षी मी सतत काम करत होते आणि मला आयुष्यात अजून बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. त्यामुळे आई होण्याची ती भावना माझ्या मनात कधी आलीच नाही. मी फक्त माझ्या शरीराचा आणि अंतर्मनाचा आवाज ऐकला".

लग्नाच्या ११ वर्षांनंतर पूजा आणि मनीष २०१४ मध्ये परस्पर संमतीने विभक्त झाले. प्रेक्षक आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या घटस्फोटाबाबत अनेक गैरसमज होते, ज्यावर पूजाने थेट उत्तर दिले आहे. ती म्हणाली, "माझ्या अनेक मित्रांनी मला विचारलं की, ११ वर्षांचं लग्न तुम्ही का मोडत आहात? तुझ्या आयुष्यात दुसरी कोणी व्यक्ती आहे का? पण माझं उत्तर 'नाही' असं होतं. माझ्या आयुष्यात दुसरा कोणताही पुरुष नव्हता. आम्ही वेगळे झालो कारण त्या नात्यात मला प्रचंड एकटेपणा जाणवत होता".

पूजा पुढे म्हणाली, "जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत राहत असूनही स्वतःला एकटं अनुभवता, तेव्हा ते नातं खऱ्या अर्थाने नातं राहत नाही. मी मनीषला स्पष्ट सांगितलं की, आपलं नातं मैत्री आणि विश्वासावर सुरू झालं होतं. मी कधीही त्याच्यावर संशय घेतला नाही. पण त्या प्रवासात मी एक स्त्री म्हणून स्वतःला हरवून बसले होते. मला माझं अस्तित्व पुन्हा मिळवायचं होतं. केवळ लग्न टिकवून ठेवण्यासाठी खोटं आयुष्य जगणं तीला मान्य नव्हतं".

पूजाने दिग्दर्शन केलेल्या 'पाप' (२००३) या पहिल्या चित्रपटाच्या कामादरम्यान तिची आणि मनीष मखिजाची भेट झाली होती. त्यानंतर ऑगस्ट २००३ मध्ये गोव्यात एका खासगी समारंभात त्यांनी लग्नगाठ बांधली होती. तब्बल ११ वर्षांच्या संसारानंतर २०१४ मध्ये त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >