Friday, May 29, 2026

IPL 2026 : आयपीएलमध्ये खेळाडूंच्या 'फिटनेस'चा खेळखंडोबा !

IPL 2026 : आयपीएलमध्ये खेळाडूंच्या 'फिटनेस'चा खेळखंडोबा !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): यंदाच्या आयपीएल हंगामाच्या अखेरीस केवळ उपांत्य फेरीतील संघ निश्चित झाला नाही, तर भारतीय क्रिकेटपटूंच्या तंदुरुस्ती व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्नही पुन्हा एकदा समोर आला आहे. राजस्थान, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता यांच्या सामन्यांदरम्यान अनेक खेळाडू दुखापती असूनही मैदानात उतरल्याचे स्पष्ट झाले असून त्यावरून क्रिकेट वर्तुळात चिंता व्यक्त होत आहे.

मुंबई संघाने अखेर जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली, मात्र हा निर्णय उशिराने घेतल्याची चर्चा सुरू आहे. संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतरही बुमराहला सलग सामने खेळवण्यात आले. संघाचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी स्पर्धेपूर्वीच बुमराहला किरकोळ दुखापत असल्याचे मान्य केले होते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या उत्कृष्टता केंद्रात बुमराहवर उपचार झाले होते. ही दुखापत पाठीची नसून गुडघ्याशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. तरीदेखील त्याला सुरुवातीपासूनच अंतिम संघात स्थान देण्यात आले. दुसरीकडे रोहित शर्माच्या दुखापतीच्या काळात मात्र मुंबई संघाने अधिक सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले.

तर कोलकाता संघाचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती हाही सूक्ष्म हाडांच्या दुखापतीसह खेळत असल्याचे उघड झाले. संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसारच हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. पंजाब संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हाही शारीरिक मर्यादांसह खेळत असल्याचे संघ व्यवस्थापनाने सांगितले. या सर्व घटनांमुळे आयपीएलमधील स्पर्धात्मक दबाव आणि भारतीय क्रिकेटपटूंच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलदरम्यान खेळाडूंच्या कामाच्या ताणावर थेट नियंत्रण ठेवणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मात्र आगामी आंतरराष्ट्रीय मालिकांच्या पार्श्वभूमीवर दुखापतग्रस्त किंवा मानसिकदृष्ट्या थकलेले खेळाडू भारतीय संघासाठी धोक्याची घंटा ठरू शकतात, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >