Friday, May 29, 2026

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील दुर्दैवी घटना; तीन तरुण विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू!

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील दुर्दैवी घटना; तीन तरुण विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू!

अहिल्यानगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील लोणी परिसरातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. लोणीजवळील चंद्रपूर गावातील साठवण तलावात (Lake) बुडून तीन तरुण विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणांवर काळाने अचानक झडप घातल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मृत झालेले तिन्ही विद्यार्थी स्थानिक ‘पायरेन्स आयबीएमए’ (IBMA) कॉलेजमध्ये एमबीएच्या (MBA) दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होते.

अभिषेक गंगाधर जाधव (वय २४, रा. सुरेगाव शिंगणापूर, ता. नेवासा), प्रवीण प्रभाकर रसाळ (वय २३, रा. रामनगर, छत्रपती संभाजीनगर) आणि महेश अशोक शिंदे (वय २६, रा. संत ज्ञानेश्वर नगर, छत्रपती संभाजीनगर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. या तिघांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे सर्व विद्यार्थी मित्रांसोबत फिरण्यासाठी चंद्रपूर (Chandrapur) येथील साठवण तलाव परिसरात गेले होते. परिसरात फिरत असताना काही विद्यार्थी तलावाच्या पाण्यात उतरले. मात्र, पाण्याची खोली आणि पाण्याखाली असलेल्या खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अभिषेक, प्रवीण आणि महेश हे तिघेही अचानक खोल पाण्यात जाऊ लागले. काही क्षणातच ते बुडू लागल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

सोबत असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरडा करून मदतीसाठी हाक मारली. विद्यार्थ्यांचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिक आणि रहिवासी तातडीने घटनास्थळी धावून आले. स्थानिकांनी पाण्यात उतरून तिघांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तलावातील पाण्याची खोली आणि प्रवाह अधिक असल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. नागरिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण त्यांच्या हाती येण्यापूर्वीच या तिन्ही तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

एकाच वेळी कॉलेजमधील (College) तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मित्रांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. कॉलेज परिसरातही शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे चंद्रपूर आणि लोणी परिसरातही दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून लोणी पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >