'प्रहार'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग
मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेची आणि व्याकरणाची अक्षम्य मोडतोड करणारा वादग्रस्त सूचनाफलक अखेर प्रशासनाकडून हटवण्यात आला आहे. राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयाच्या ‘गार्डन गेट’वर मराठीचे धिंडवडे निघत असल्याचे वृत्त ‘दै. प्रहार’ने बुधवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने हा चुकीचा फलक तिथून काढून घेतला आहे.
मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; रोजगारनिर्मितीसाठी राबवणार मोबाईल फूड व्हॅन योजना मुंबई : राज्यातील मच्छीमारांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ ...
मंत्रालयात दुपारी दोन वाजल्यानंतर येणाऱ्या अभ्यागतांच्या रांगेसाठी प्रवेशद्वाराबाहेर एक फलक लावण्यात आला होता. या फलकावर “मंत्रालय प्रवेश करीता ०२.०० वाजल्यांचे रांग येथुन चालु” असे अत्यंत चुकीचे, अर्थहीन आणि व्याकरणशून्य वाक्य लिहिण्यात आले होते. या अशुद्ध भाषेमुळे मंत्रालयात येणाऱ्या शेकडो नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. तसेच, मंत्रालयातच मराठी भाषा विभागाचे कार्यालय असताना, या विभागाच्या नाकाखाली मराठीची अशी दुरवस्था होत असल्याकडे ‘प्रहार’ने लक्ष वेधले होते.

हे वृत्त प्रसिद्ध होताच शासकीय वर्तुळात मोठी खळबळ झाली. सोशल मीडियावरही या अशुद्ध फलकाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रशासनावर जोरदार टीका होऊ लागली होती. वाढता दबाव आणि नामुष्की टाळण्यासाठी अखेर हा वादग्रस्त फलक तिथून पूर्णपणे हटवण्यात आला.




