Tuesday, May 26, 2026

Kajuli biswas : संघर्ष आणि नि:स्वार्थ सेवेची कहाणी : काजुली विश्वास

Kajuli biswas : संघर्ष आणि नि:स्वार्थ सेवेची कहाणी : काजुली विश्वास

पश्चिम बंगालच्या काजुली विश्वास यांनी गरिबी, उपासमार, बेघरपणा आणि आपल्याच लोकांची उपेक्षा सहन केली, पण या कष्टांनी त्यांच्या हृदयात माणुसकी रुजवली. आता, त्या दररोज १०० भुकेल्या आणि निराधार लोकांना अन्न पोहोचवतात. कटवा स्टेशन परिसरात राहणारे गरीब, वृद्ध, मजूर आणि निराधार मुले त्यांच्या येण्याची वाट पाहत असतात. काजुली विश्वास यांच्या प्रवासाची कहाणी, त्यांच्याच शब्दांत... माझा जन्म पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. माझे वडील शेतकरी होते आणि आई गृहिणी होती. माझ्या भावाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. गरजा खूप होत्या आणि साधनसामग्री कमी होती. अनेकदा, एका वेळच्या जेवणाची सोय करणेही अवघड असायचे. इतर वेळी, आम्ही पाणी पिऊन झोपून जायचो. मी कधी शाळेत गेले नाही, पण आयुष्याच्या शाळेने मला एक अशी गोष्ट शिकवली जी कोणतेही पाठ्यपुस्तक शिकवू शकले नसते, ती म्हणजे दुसऱ्यांचे दुःख समजून घेणे.

पण म्हणतात ना - कष्टाचा आवाज कुणाला ऐकू येत नाही, पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकते..! काजुली यांनाही काहीशा अशाच परिस्थितीतून जावं लागलं. बालपणीच्या उपासमारीच्या वेदनेतून त्यांनी रस्त्यावरील भुकेल्या लोकांचे दुःख ओळखले आणि त्यांना जेवू घालण्याचा निर्धार केला परंतु त्यांच्या पतीने त्यांच्या या कार्याला विरोध दर्शवत त्यांना घराबाहेर काढलं. पतीच्या विरोधाला न जुमानता त्यांनी घर सोडलं आणि आता दररोज न चुकता त्या १०० निराधार व गरजू लोकांचे पोट भरत आहेत.

त्या रोज सकाळी ३ वाजता उठतात आणि स्वयंपाकाला सुरुवात करतात. पाच किलो भाज्या, पोळ्यांसाठी १० किलो पीठ आणि डाळ-भात बनवतात. एवढेच नव्हे तर स्वतः अन्न घेऊन रस्त्यावर जातात आणि गरिबांसोबत प्रेमाने आणि आपुलकीने बसून त्यांना जेवू घालतात. त्या म्हणतात, “आता बरेच लोक माझ्यासाठी कुटुंबासारखे झाले आहेत. ते रस्त्यावर असहाय्यपणे राहतात. अन्न खाऊन ते चांगल्या भविष्याची आशा करू शकतात. आज माझ्याकडे त्यांना देण्यासाठी काहीही नाही, पण मी गरिबांसाठी एक रेस्टॉरंट उघडण्याचा मी प्रयत्न करेन.”

सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर आता अनेक लोक त्यांच्या या उदात्त कार्यासाठी पुढे येत आहेत. लोक त्यांना धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू देऊन मदत करत आहेत, जेणेकरून कोणीही उपाशी राहू नये. कोणतीही मोठी संस्था किंवा एनजीओ नसताना, त्या स्वतःच्या हिमतीवर रोज १०० हून अधिक लोकांना अन्नदान करत आहेत. काजुली विश्वास यांचा हा त्याग आणि सेवा खरोखर कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्याला सलाम आहे.

Comments
Add Comment