Friday, May 8, 2026

BMC News : दक्षिण मुंबईतील पाणी पुरवठा शनिवारपासून पूर्ववत

BMC News : दक्षिण मुंबईतील पाणी पुरवठा शनिवारपासून पूर्ववत

- मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम ४४ तासांच्‍या प्रयत्‍नानंतर पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

जी दक्षिण विभागातील डॉ. ई. मोझेस मार्गावरील १६५० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला तडा गेल्याचे निदर्शनास येताच महानगरपालिका प्रशासनाने बुधवारी ६ मे २०२६ रोजी रात्री १० वाजल्या पासून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत अभियंते व कामगार - कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत अवघ्या ४४ तासांत हे महत्त्वपूर्ण दुरुस्तीकार्य यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. जलवाहिनी पूर्ण क्षमतेने भरून कार्यान्वित झाली असून शुक्रवारी ८ मे २०२६ रोजीचा सायंकाळचा पाणीपुरवठा सुरळीत करण्‍यात येत आहे. तसेच, शनिवार, ९ मे २०२६ पासून ‘डी’, ‘ई’ आणि ‘जी दक्षिण’ विभागांतील बाधित भागांचा पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. दरम्यान, या जलवाहिनी दुरूस्‍तीचे काम नियोजित वेळेपूर्वी पूर्ण केल्याबद्दल महानगरपालिका आयुक्‍त आश्विनी भिडे यांनी जल अभियंता विभागातील अधिकारी - कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

डॉ. ई. मोझेस मार्गावरील जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणावर गळती झाल्‍याचे बुधवारी ६ मे २०२६ रोजी सायंकाळी आढळून आले. १६५० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला तडा गेल्याचे निष्‍पन्‍न झाल्‍यावर जलवाहिनीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्‍यात आला. प्रत्यक्ष दुरुस्ती काम बुधवारी ६ मे २०२६ रोजी रात्री १० वाजेपासून सुरु झाले.

गळती लागलेली जलवाहिनी जमिनीखाली सुमारे १५ फूट (अंदाजे ५ मीटर) खोलवर असल्याने प्रथम व्यापक खोदकाम करून ती खुली करण्यात आली. त्यानंतर जलवाहिनीवर मनुष्य प्रवेशिका (मॅनहोल) तयार करून आत साचलेले पाणी उपसण्यात आले. तपासणीदरम्यान, मनुष्य प्रवेशिकेपासून सुमारे १२ फूट (अंदाजे ४ मीटर) अंतरावर जलवाहिनीला गंभीर हानी पोहोचल्याचे आढळून आले. मृदु पोलादाच्‍या जलवाहिनीवर ५ फुट बाय २.५ फुटाचे पोलादी प्लेटचे ७ तुकडे 'पॅच वेल्‍डींग' द्वारे जोडण्‍यात आले. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत सुमारे १५ फूट (अंदाजे ५ मीटर) खोल आणि १२ फूट (अंदाजे ४ मीटर) लांबीच्या अरुंद जागेत प्रवेश करून दुरुस्तीचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. या संपूर्ण कामासाठी आवश्यक साहित्य, अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि प्रशिक्षित मनुष्यबळ यांची योग्य व सुसज्ज व्यवस्था करण्यात आली होती.

अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्‍या मार्गदर्शनाखाली आणि जल अभियंता दिलीप पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली दुरूस्‍ती कामे पूर्ण करण्‍यात आली आहेत. उप जल अभियंता (परिरक्षण), कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, दुय्यम अभियंता यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, ४० कर्मचारी यांनी प्रत्यक्ष दुरुस्ती ठिकाणी अथक प्रयत्न केले आणि दुरुस्ती कामांमध्ये समन्वय देखील साधला. शुक्रवार, ८ मे २०२६ रोजीचा सायंकाळचा पाणीपुरवठा सुरळीत करण्‍यात येत आहे. तसेच, शनिवार, ९ मे २०२६ पासून ‘डी’, ‘ई’ आणि ‘जी दक्षिण’ विभागांतील बाधित भागांमधील पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >