पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि KPIT Technologies चे संस्थापक व अध्यक्ष रवी पंडित यांचे आज (८ मे) पुण्यात निधन झाले. कंपनीने अधिकृत एक्स्चेंज फायलिंगद्वारे ही माहिती दिली. त्यांच्या निधनाने केवळ पुणे शहरच नव्हे, तर जागतिक ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
उद्योगा सोबत सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान
रवी पंडित यांचे कार्य केवळ उद्योग क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते. ते कीर्तने आणि पंडित. या अग्रगण्य चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेचे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि जनवाणी यांसारख्या संस्थांच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली.ज्ञान प्रबोधिनी चे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम केले. तसेच गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेच्या माध्यमातून शाश्वत विकास आणि धोरणात्मक संशोधनाला त्यांनी प्रोत्साहन दिले.
शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी
रवी पंडित हे चार्टर्ड अकाउंटन्सी परीक्षेत सुवर्णपदक विजेते होते. त्यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट येथून उच्च शिक्षण घेतले होते. त्यांच्या बौद्धिक योगदानामुळे त्यांना भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे ‘फेलो’ म्हणूनही गौरवण्यात आले होते.त्यांचे उडी मारण्यापासून ते पोल-व्हॉल्टिंगपर्यंत हे पुस्तक अनेक नवोदित उद्योजकांसाठी मार्गदर्शक मानले जाते.
पुण्याच्या विकासासाठीही पुढाकार
पुण्याला ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यासाठी त्यांनी जनवाणी या संस्थेद्वारे कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. तंत्रज्ञान आणि सामाजिक मूल्यांचा समन्वय त्यांच्या कामात नेहमी दिसून येत असे.
‘केपीआयटी’चे सहसंस्थापक, अध्यक्ष, ज्येष्ठ सनदी लेखापाल आणि दूरदृष्टी असलेले उद्योजक श्री. रवी पंडित यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. माहिती तंत्रज्ञान, उद्योग, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवून अनेक संस्थांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून… pic.twitter.com/BKUK7wCItc
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) May 8, 2026
उद्योगविश्वाने दूरदर्शी नेतृत्व गमावले
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार .यांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केली. माहिती तंत्रज्ञान, उद्योग, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात रवी पंडित यांनी दिलेले योगदान मोठे असून त्यांच्या निधनाने उद्योगविश्वाने एक संवेदनशील आणि दूरदर्शी नेतृत्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.रवी पंडित यांच्या निधनामुळे पुणे शहरासह देशातील उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशी भावना व्यक्त होत आहे.






