नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत विक्रमी मतदान होत असल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोगाने दुपारी तीन वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी जाहीर केली आहे. पश्चिम बंगालमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ७८ टक्के तर तामिळनाडूत दुपारी तीन वाजेपर्यंत ७० टक्के मतदान झाले.
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत विधानसभेची निवडणूक सुरू आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पश्चिम बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिल असे दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर तामिळनाडूत आज म्हणजेच २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात सर्व जागांसाठी मतदान होत आहे.
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात म्हणजे आज २३ एप्रिल रोजी १५२ विधानसभा मतदारसंघांसाठी तर तामिळनाडूत विधानसभेच्या सर्व म्हणजेच २३४ जागांसाठी मतदान सुरू आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत दोन्ही राज्यांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली आहे. यामुळे यंदा पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत विक्रमी मतदान होणार असल्याचे मत राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी १४७८ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होत आहे. राज्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत आहे. निवडणूक काळात झालेल्या जाळपोळ, तोडफोड आणि मारहाणीच्या घटनांनी परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. मुर्शिदाबादमध्ये एजेयूपी प्रमुख आणि रेजीनगरचे उमेदवार हुमायून कबीर यांच्या ताफ्यावर दंगलखोरांनी काठ्या आणि विटांनी हल्ला केला. या घटनेनंतर टीएमसी आणि एजेयूपी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संघर्ष झाला. कबीर यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून पोलिसांशीही त्यांचा वाद झाला. दक्षिण दिनाजपूरमधील कुमारगंजमध्ये भाजप उमेदवार सुवेंदू सरकार यांच्यावरही हल्ला झाल्याचा आरोप आहे. बूथ जॅमिंगची तक्रार मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या सरकार यांना काही जणांनी मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले.
कूचबिहारच्या तुफानगंज परिसरात मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्रीय सुरक्षा दलांनी लाठीमार करत जमाव पांगवला. मालदामध्ये ईव्हीएम बिघाडामुळे संतप्त मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्याला घेराव घालून ओलीस धरले. तसेच हरिश्चंद्रपूरमध्ये टीएमसीच्या दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षात पक्षाच्या कॅम्प ऑफिसची तोडफोड करण्यात आली. सिलिगुरीमध्ये टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्राबाहेर हाणामारी झाली. केंद्रीय दलांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
तृणमलू काँग्रेस अर्थात टीएमसीने बाहेरून गुंड आणल्याचा आरोप होत आहे. आसनसोल उत्तरचे उमेदवार मलय घटक यांनी पाच विशेष ट्रेनमधून बाहेरील लोकांना आणल्याचा दावा करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
.............
दुपारी तीन वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारीमहाराष्ट्रातील बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक : ३९. ६० टक्के मतदान (मुख्य उमेदवार सुनेत्रा अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस)
महाराष्ट्रातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक : ४०.३६ टक्के मतदान (मुख्य उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले, भारतीय जनता पार्टी)






