Saturday, March 21, 2026

मुंबईकरांवर पाणी संकटाची टांगती तलवार

मुंबईकरांवर पाणी संकटाची टांगती तलवार

मुंबई : मुंबईला दरदिवशी होणाऱ्या एकूण पाणी पुरवठ्याच्या निम्म्या पाण्याचे शुद्धीकरण भांडुप संकुलातील जलशुध्दीकरण केले जाते. तिथून मुंबईकरांना याचा पाण्याचा पुरवठा होतो. मात्र, धरणातून येणारे पाणी उचलण्यासाठी तसेच मुंबईला पुरवठा करण्यासाठी याठिकाणी असणाऱ्या पंपिंग स्टेशन्समधील चार पंप जुने झालेत. २० हजार पेक्षा अधिक तास या पंपाचा वापर झाल्यामुळे हे कालबाह्य होवू लागले आहेत. भविष्यामध्ये या पंपाची योग्यप्रकारे दुरुस्ती न झाल्यास मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळण्याची शक्यता आहे.

मुंबईला दरदिवशी ४१०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्यातील १९१० दशलक्ष लिटर पाण्यासाठी भांडुप संकुलात पंपिंग स्टेशन कार्यरत आहे. १९७८ ते ८०मध्ये हे पंपिंग स्टेशन कार्यान्वित झाले. तेव्हापासून मुंबईला पाण्याचा पुरवठा करण्याकरता हे पंपिंग स्टेशन २४ तास सुरु आहे. या पंपिंग स्टेशनमध्ये २४६ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे ११ व ८२ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे ३ पंप कार्यरत आहे. हे ११ पंप ६२० किलो वॅट क्षमतेचे आहेत, तर २२० किलो वॅट क्षमतेच्या ३ पंपांचा समावेश आहे. त्यामुळे दिवसाला ७ अधिक २ किंवा जास्तीतजास्त ८ अधिक २ अशाप्रकारे पंप चालवले जातात. तांत्रिक सल्लागारांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक २० हजार तासांनंतर पंपांची मुख्य दुरुस्ती करणे आवश्यक असते. परंतु सध्या वापरात असलेल्या २४६ प्रतिदिन क्षमतेचे २ पंप आणि ८० दशलक्ष लिटर क्षमतेचे २ पंप हे २० हजार पेक्षा अधिक तास उलटून गेले आहेत. तसेच यांचा कालावधी पाच वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या पंपांची मुख्य दुरुस्तीचा विचार केला जात असून प्रत्यक्षात या पंपाच्या दुरुस्तीनंतर किती फायदा होणार याचाही अंदाज खुद्द महापालिकेच्या अभियंत्यांना नाही. त्यामुळे दुरुस्तीनंतर हे पंप किती चालतील हा प्रश्न असून जर हे पंप बंद पडले तर अतिरिक्त पंप महापालिकेकडे नसल्याने भविष्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण होवू शकते. मुंबईत सध्या अनेक ठिकाणी पाण्याची तीव्र समस्या असून प्रत्येक नगरसेवकाला सध्या पाण्याच्या तक्रारींचा सामना करावा लागतो. त्यामुळे पुढे हे पंप बंद पडल्यास मुंबई महापालिका प्रशासन काय करणार,असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Comments
Add Comment