Thursday, March 5, 2026

भटक्या श्वानांच्या नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवा

भटक्या श्वानांच्या नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांचे नियंत्रण, निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. असे असले तरी या उपाययोजनांना गती देण्यासाठी, त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी क्षमता वाढविणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर, नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवणे, प्राणी निवारा केंद्रांची निर्मिती करणे, सर्व प्रशासकीय प्रभागनिहाय श्वान पकडणारी वाहने आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देणे इत्यादी उपाययोजना राबविण्यात याव्यात. एकूणच प्राणी व्यवस्थापन अधिक शास्त्रीय आणि मानवीय पद्धतीने करण्यात यावे, अशी सूचना मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे.

यासंदर्भात महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मुंबईमध्ये भटक्या श्वानांची संख्या मागील काही वर्षांत लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे आढळून आले आहे. विविध प्रभागांमध्ये श्वानांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हा विषय सार्वजनिक आरोग्य, नागरिकांची सुरक्षितता आणि नागरी व्यवस्थापन या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.

महानगरपालिकेकडून प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असला तरी विद्यमान पायाभूत सुविधा आणि उपलब्ध क्षमता ही मुंबईतील श्वानांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत अपुरी ठरत आहे. सध्या मुंबईत सुमारे ८ अशासकीय संस्थामार्फत नसबंदीकरण व लसीकरणाची कामे केली जातात. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २६ प्रशासकीय प्रभागांमध्ये भटक्या श्वान संख्येवर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी या क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ करणे आवश्यक आहे. यादृष्टीने पुढील काही उपाययोजना सुचवित आहे.

नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढविणे - सध्या कार्यरत असलेल्या ८ अशासकीय प्राणीप्रेमी संस्थांव्यतिरिक्त मुंबईच्या विविध भागांमध्ये नवीन नसबंदीकरण केंद्रे स्थापन करणे आवश्यक आहे. यामुळे श्वानांच्या नसबंदी आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरणाची क्षमता वाढेल. तसेच श्वानांची संख्या नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेले वार्षिक लक्ष्य साध्य करता येईल.

अशा प्रकारे सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविल्यास भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळविता येईल, श्वान चावण्याच्या घटनांमध्ये घट होवू शकते आणि नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ करता येईल. समवेत, नागरी प्राणी व्यवस्थापन अधिक शास्त्रीय आणि मानवीय पद्धतीने राबविता येईल. त्यामुळे सदर विषयाचा प्राधान्याने विचार करून आवश्यक प्रशासकीय मान्यता व अंमलबजावणीबाबत कृपया पुढील कार्यवाही करण्यात यावी, असे महापौर रितू तावडे यांनी या पत्रात नमूद केले आहे.

Comments
Add Comment