Wednesday, March 4, 2026

Mumbai News : वरळी नाका होणार 'ट्रॅफिक फ्री'! २ किमीचा वळसा आता संपणार, पालिकेचा मास्टरप्लॅन; २ नवीन पुलांमुळे प्रवासाचा वेळ वाचणार

Mumbai News : वरळी नाका होणार 'ट्रॅफिक फ्री'! २ किमीचा वळसा आता संपणार, पालिकेचा  मास्टरप्लॅन; २ नवीन पुलांमुळे प्रवासाचा वेळ वाचणार

मुंबई : दक्षिण मुंबईतील सर्वात गजबजलेला भाग असलेल्या वरळी नाक्यावरील वाहतुकीचा ताण कायमचा कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. वरळीतील दोन महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणाऱ्या 'मिसिंग लिंक'वर पालिकेचा पूल विभाग आता दोन अत्याधुनिक पुलांची उभारणी करणार आहे. या नवीन पुलांमुळे वरळी नाक्यावर होणारी वाहनांची भीषण कोंडी फुटण्यास मोठी मदत होणार असून, या परिसरातील वाहतुकीचा भार जवळपास ५० टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे दोन्ही पूल अस्तित्वात आल्यानंतर वाहनधारकांना वरळी नाक्यावर न अडकता थेट इच्छित स्थळी पोहोचता येईल. सध्या या भागात सिग्नल आणि अरुंद रस्त्यांमुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाया जातो, मात्र या पुलांच्या कामामुळे 'मिसिंग लिंक' पूर्ण होऊन कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे केवळ वरळीकरच नाही, तर दक्षिण मुंबईत ये-जा करणाऱ्या हजारो चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दोन प्रमुख मार्ग थेट जोडले जाणार

सध्या लोअर परळ, प्रभादेवी आणि पेडर रोडला जोडणाऱ्या डॉ. ॲनी बेझंट मार्ग व ई मोजेस मार्ग या दोन रस्त्यांमध्ये थेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हे दोन्ही रस्ते एकमेकांना समांतर असूनही, एका रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यावर जाण्यासाठी वाहनधारकांना वरळी नाक्यापर्यंत तब्बल २ किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. यामुळे इंधन आणि वेळ दोन्ही वाया जात असल्याने पालिकेने आता यावर कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाने नेहरू विज्ञान केंद्र (Nehru Science Centre) येथील नाल्यावर एका नवीन पुलाची उभारणी करण्याचे नियोजन केले आहे. हा नवीन पूल थेट नेहरू तारांगणाजवळ (Nehru Planetarium) उतरणार आहे. या पुलामुळे डॉ. ॲनी बेझंट मार्ग आणि ई मोजेस मार्ग हे दोन्ही प्रमुख रस्ते एकमेकांना थेट जोडले जातील. परिणामी, वाहनचालकांना आता वरळी नाक्यावर जाण्याची गरज उरणार नाही, ज्यामुळे त्या भागातील वाहतुकीचा ताण निम्म्याने कमी होईल आणि कोस्टल रोडकडे जाणारा प्रवास अधिक सुखकर होईल.

वरळीतील 'नाल्यावरील' पुलाचे काम अंतिम टप्प्यात; फेब्रुवारी २०२७ ची डेडलाईन

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प आता आपल्या निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, तो पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या हजारो वाहनचालकांचा प्रवासाचा वेळ किमान १५ मिनिटांनी वाचणार आहे. हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक मानला जात आहे, कारण हा संपूर्ण पूल एका विशाल नाल्यावर उभारला जात आहे. दलदलीचा भाग आणि पाण्याचा प्रवाह लक्षात घेता, पुलाचे पिलर्स आणि स्ट्रक्चर उभे करताना पालिकेच्या पूल विभागाला विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे. मात्र, वरळी नाक्यावरील ट्रॅफिक जॅममधून सुटका करण्यासाठी हा पूल 'गेम चेंजर' ठरणार आहे. एकदा हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला की, डॉ. ॲनी बेझंट मार्ग आणि ई मोजेस मार्ग यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारून प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

नेहरू केंद्र आणि तारांगण आता येणार एकमेकांच्या जवळ

मुंबईतील वरळी परिसरातील दोन प्रमुख पर्यटन स्थळे, नेहरू विज्ञान केंद्र आणि नेहरू तारांगण, एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर असूनही सध्या पर्यटकांना आणि वाहनचालकांना तिथे पोहोचण्यासाठी मोठा वळसा घालावा लागतो. मात्र, महानगरपालिकेने हाती घेतलेल्या नवीन पुलामुळे हा फेरा आता कायमचा बंद होणार आहे. या पुलाच्या उभारणीमुळे ही दोन्ही महत्त्वाची स्थळे रस्तेमार्गे थेट जोडली जाणार असून, पर्यटकांचा वेळ आणि कष्ट दोन्ही वाचणार आहेत. या पुलाचा सर्वात मोठा फायदा मुंबईच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडला (सागरी किनारा मार्ग) होणार आहे. या नवीन लिंकमुळे कोस्टल रोडवरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांना वरळीतील अंतर्गत भागात शिरणे आणि बाहेर पडणे अधिक सुलभ होईल. पर्यायाने, दक्षिण मुंबईतील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होऊन सागरी किनारा मार्गाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना हा एक उत्तम 'कनेक्टिंग पॉईंट' ठरणार आहे. यामुळे केवळ पर्यटनच नाही, तर दैनंदिन प्रवासाची गतीही वाढणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >