जीवनगंध : पूनम राणे
शारदा विद्यालयात रेहान नावाचा विद्यार्थी शिकत होता. तो इयत्ता दहावीला होता. अत्यंत नम्र, हुशार, मितभाषी. मुळात सेवाभाव असणारा. उंच, गोरावर्ण. त्याचे आई-वडीलही उच्चविद्याविभूषित होते. दोघेही उच्च पदावर कार्यरत होते. अगदी चार दिवसांत दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू होणार होती. रेहान रात्रीचा दिवस करून अभ्यास करत होता. वर्गात तो नेहमीच प्रथम क्रमांकाने पास होई. त्यामुळे शाळेकडूनही त्याच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या.
त्याला स्वतंत्र अभ्यास खोली होती. त्यामुळे एकांतात तो मन एकाग्र करून अभ्यास करायचा. गणित, इंग्रजी अशा नेमक्या विषयांसाठी त्याने शिकवणी लावली होती. अनेक दिवस तो टीव्ही, मोबाईल यांसारख्या प्रसार माध्यमांपासून लांब होता.
अखेर परीक्षेचा दिवस उजाडला. सोबत कंपास बॉक्स, हॉल तिकीट घेतले होते. आज मराठीचा पेपर होता. पेपर हातात मिळतात त्याने तो पेपर भरभर वाचून काढला. पेपर अतिशय सोपा होता. वाचनाचा व्यासंग असल्याने पत्रलेखन, निबंध, कथा लेखन, सारांश लेखन, वृत्तांत लेखन या साऱ्या गोष्टी त्याला लिहिणे सोप्या गेल्या होत्या. तीन तास एकाग्र होऊन तो पेपर लिहीत होता. तीन तास केव्हा संपले त्याला कळलेच नाहीत. अखेर पेपर देऊन तो वर्गाच्या बाहेर पडला. पेपर सोपा गेल्याने प्रसन्नमुद्रेने तो घरी निघाला. दुसऱ्या दिवशी इंग्रजीचा पेपर होता. त्याची तयारी तो रात्रभर करत होता. आई आणि बाबांना महत्त्वाचे काम असल्याने ते घरी राहू शकत नव्हते. अाईने कामावरून रेहानला फोन केला; परंतु रेहान फोन उचलत नव्हता. यानंतर आईने त्यांच्या बाजूला राहत असणाऱ्या काकांना फोन केला. काकांनी जाऊन बेल वाजवली; परंतु रेहान काही दरवाजा उघडत नव्हता. यामध्ये दहा-पंधरा मिनिटे निघून गेली. त्यांनी आईला फोन करून सांगितले की, रेहान दरवाजा उघडत नाही. आईची महत्त्वाची मीटिंग असल्याने ती सुद्धा कामावरून परत येऊ शकत नव्हती. म्हणून तिने बाबांना फोन केला. बाबा ताबडतोब कामावरून घरी निघाले. कामावरून घरी येईपर्यंत पाऊण तास गेला.
त्यांनी स्वतःकडील चावीने दरवाजा उघडला. पाहतात तर काय रेहान गाढ झोपेत होता. बाबांनी त्याला जोरात हलवत आवाज देत उठून बसवलं. डोळे चोळत तो उठून बसला. गेल्या एक महिन्यापासून त्याने नीट झोप सुद्धा घेतली नव्हती. त्यामुळे पुस्तक वाचता वाचता त्याला केव्हा झोप लागली हे त्यालाही समजले नाही.
मात्र आजचा पेपर त्याचा चुकला होता. एक वर्ष त्याचे वाया गेले होते. गेलेली वेळ पुन्हा येणार नव्हती. परिणामी त्याच्या पालकांना आणि त्याला खूप पश्चाताप झाला.
तात्पर्य : गेलेली वेळ पुन्हा येत नाही







