मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाशेजारी नव्याने आकाशमार्गिका अर्थात स्कायवॉकचे लोकार्पण करण्यात आले आहे. परंतु या नव्याने बांधलेल्या स्कायवॉकच्या बांधकामातील कामांना अंतिम स्वरुप न दिल्यामुळे तसेच धातूरमातूर काम केल्यामुळे घाईगडबडीत चालणाऱ्यांना नजर हटी, दुघर्टना घटी याचा अनुभव येत आहे. वांद्रे न्यायालयाच्या ठिकाणी पायऱ्यांची व्यवस्था केली असून हाय वे ओलांडून जाता येवू नये म्हणून तिथून जोडलेल्या भागात चार ते पाच पायऱ्या असून त्यातील शेवटच्या पायरीमधील अंतर अधिक असल्यामुळे पहिल्या तीन ते चार पायऱ्यांच्या अंदाजावर चालणाऱ्या पादचाऱ्याला शेवटच्या पायऱ्यावर पाऊल ठेवल्यानंतर अडकून पडल्यासारखेच होते आणि यामुळे या पायऱ्यांचा न अंदाज आल्याने घालीन लोटांगण घालण्याची वेळ त्यांच्यावर येते.
मुंबई महापालिकेच्यावतीने वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते न्यायालय आणि म्हाडा कार्यालय याठिकाणी जाण्यासाठी आकाश मार्गिका अर्थात स्कायवॉकचे बांधकाम केले आहे. स्कायवॉकचे लोकार्पण राज्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. मात्र, घाईघाईत हे स्कायवॉक सुरु करताना संबंधित कंत्राटदाराने प्रत्येक पायऱ्यांच्या ठिकाणी असलेली लोखंडी पट्टी ही योग्यप्रकारे न बनवल्यामुळे ती ओबडधोबडच दिसत आहे. त्यामुळे त्या लोखंड पट्टीला लागून पादचारी पडला जाण्याची शक्यता आहे. तसेच काही पायऱ्यांच्या ठिकाणी तुटलेल्या लाद्या तशाच ठेवण्यात आल्या आहेत. तसेच न्यायालच्यासमोरील भागात खाली उतरुन जाण्यासाठी चार ते पाच पायऱ्यांची व्यवस्था केली आहे. यामध्ये पहिल्या तीन ते चार पायऱ्याचे मोजमाप समान आहे, पण शेवटच्या पायऱ्यांमधील अंतर आधीच्या चार पायऱ्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे सहा ते सात इंचाची पायरी आहेत, तिथे शेवटची पायरीचे अंतर हे नऊ ते दहा इंच एवढे आहे. त्यामुळे अनेकदा अंदाजानुसार पायऱ्या उतरणाऱ्या पादचाऱ्याला शेवटचा पायरीवर अंदाज चुकल्यामुळे तोल जावून पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे पुल विभागाच्या अभियंत्यांचा दुर्लक्षितपणा असून कंत्राटदाराने या पुलाच्या कामात हातचलाखी करत योग्यप्रकारचे काम केले नसल्याचे दिसून येत आहे.
स्कायवॉकच्या दैनंदिन देखभालीकडे दुर्लक्ष
या स्कायवॉकवर स्टिलच्या थुंकदाणी तसेच कचरा पेट्या असून या कचऱ्या पेट्यांमध्ये काळ्या रंगाच्या पिशव्यांचा उपयोग केला जात नाही. परिणामी त्यातील पाणी खाली गळून जाते. तसेच कचरा उचलला जात नसल्यामुळे त्यातील कचरा खाली सांडला जातो, याशिवाय दैनंदिन वापरामुळे हे स्कायवॉकचे स्वच्छ दिसत असले तरी दोन्ही बाजुला कचऱ्याचे आणि पिचकाऱ्यांचे दर्शन घडत असते.







