मुंबई: आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशी हतबल झाले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी कायम आहे.
धीम्या गतीने वाहतूक पुण्याच्या दिशेने:
मिळालेल्या माहितीनुसार, गॅस टँकर पलटी झाल्यानंतर तब्बल ३२ तासांसाठी बंद पडलेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर (Mumbai Pune Expressway) पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या १० किमी रांगा लागल्या आहेत. मुंबईकडून पुण्याकडे (Mumbai Pune Expressway) जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडी झाली आहे. धीम्या गतीने वाहतूक पुण्याच्या दिशेने सरकत आहे.
१० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा:
खोपोली हद्दीतील अमृतांजन पूल ते खालापूर टोल नाकादरम्यान १० किमीपर्यंत मोठया प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. विकेंड असल्याने अनेकजण घराबाहेर पडले असताना मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumbai Pune Expressway) वाहतूक कोंडीत अडकले आहेत. ३२ तास रस्ता बंद असल्याने सकाळी लवकर घाट पार करून जाण्यासाठी मोठया प्रमाणात नागरिक लवकर बाहेर पडल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याचा अंदाज आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
बोरघाटात वाहने पडली बंद:
अनेक वाहन बोरघाटात बंद पडलेली आहेत. घाटामध्ये आता पुन्हा गाड्या बंद पडल्यामुळे पूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. जोपर्यंत त्या गाड्या हटवल्या जाणार नाही तोपर्यंत वाहतूक सुरळीत होणार नाही.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडीची (Mumbai Pune Expressway Traffic) दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. भविष्यात अशी घटना घडू नये आणि घडल्यास आणखी कोणत्या प्रकारची सज्जता असावी, याबाबत चौकशी करुन शिफारसींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएसआरडीसीला दिले आहेत.






