भालचंद्र कुबल : पाचवा वेद
रघ्या गेला. नाटकाची शीर कापून एक्झिट घेता झाला. नाटक रक्तासारखं वहायचं त्याच्या नसानसातून. बऱ्याच आदरयुक्त संबोधनानी म्हणजे काका, सर, रघुभाऊ, कंडम, खिडम्या अशा नावांनी ओळखला जाणारा हा माणूस माझ्यासाठी रघ्या होता. साहित्य संघात हरीष तुळसुलकरच्या ‘कडी-कपारी’तली त्याची रांगत रांगत घेतलेली एक्झिट आमच्या दोघांची ओळख करून गेली. रघ्या १९८१ चा आय.एन.टी. स्टार होता. आजपर्यंत एक्झिटला स्टँडिंग ओव्हेशन मी त्यानंतर कधीही बघितलेलं नाही. नसीर, ओम पुरी, सारख्या सर्वसामान्य हिरो वठवणाऱ्या जमान्यातला रघ्या, मराठी रंगभूमी गाजवेल असं वाटलं होतं पण त्याच्या नोकरीने त्याला हिरो बनू दिलं नाही. पण म्हणून मग त्यानं नाटक देखील सोडलं नाही. व्ही.आर.एस. घेऊन देवगडात २५-३० कलमांची बाग घेऊन वर्षाकाठचे एकदाच कमवून बाकी दिवस नाटक करत राहिला. कणकवलीतील विजय चव्हाणांची अक्षरसिंधू आणि वामन पंडितांचे आचरेकर प्रतिष्ठान ही त्याची दोन होम ग्राऊंड होती. दोन्ही होम ग्राऊंडवर त्याने तुफान बॅटिंग केली. मी त्याचा फॅन होतो. पुढल्या काळात लेखक झाल्यावर माझ्या दोन एकांकिका करुन त्याने नंबरातही आणल्या. ‘ही संगीत शिवपंचायतनाची दुसरी बाजू’मधील सटवाई रघ्यामुळे तीव्र झाली आणि ‘अळीचा अजगर’ मधले दोघे बाप इतके ‘कोमल’ असू शकतात याचा अंदाज रघ्यानेच आणून दिला. मग काही काळाने त्याला परीक्षक म्हणूनही भेटलो. ‘झाला सोहळा अनुपम’मधे पुन्हा एकदा त्याला बेस्ट अॅक्टर द्यावे लागले. ‘आगाशे पाटील गायकवाड’ आणि ‘एक दिवस मठाकडे’ या दोनही नाट्याकृती फ्लॉप झालेल्याही मी परीक्षक म्हणून पहाव्या लागल्या. रात्रीचे ९ वाजले की ईप्कोने दात घासणारा रघ्या कुणालाही सामोरा जायचा. विशेष म्हणजे समोरच्याचे ऐकून घ्यायचा आणि नाही पटले तर खरखरणाऱ्या वर खाली होणाऱ्या पट्टीत भच्या भाषेत शिव्याही घालायचा. अशाच एका संध्याकाळी उंबरठा स्पर्धेला मी परीक्षक म्हणून रहाण्याचं नाकारलं आणि शेवटपर्यंत बोललो नाही.
याच रघुनाथ कदमला रजनीश राणे आणि अशोक परब यांनी त्याच्या स्मृतींचा जागर "स्वामीराज महोत्सवातून" १७ व १८ जानेवारीला जागवला. स्वामीराज महोत्सव हा स्वामीराज प्रकाशन संस्थेचा वार्षिक नाट्यमहोत्सव आहे, जो मराठी प्रायोगिक रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आला. स्वामीराज प्रकाशन ही मुंबईतील अग्रगण्य प्रकाशन संस्था आहे, जी नवीन रंगकर्मींना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे आणि मराठी रंगभूमीवरील प्रायोगिक नाट्यप्रयोगांना ऊर्जा देण्यासाठी ओळखली जाते. महोत्सवाचा उद्देश हा नवीन नाटकांना सादर करण्यासाठी कायम स्वरूपी प्लॅटफॉर्म मिळावा यासाठीच आयोजित केला जातो. उदाहरणार्थ, यंदाच्या म्हणजेच २०२६ च्या आवृत्तीत दोनदिवसीय कार्यक्रमात अनेक नाटके झाली. यशवंत नाट्यमंदिरातील साळगावकर सभागृह नव्या जुन्या रंगकर्मीनी भरुन गेले होते. रघुनाथ कदमला आठवताना विक्रम भागवत, विजय चव्हाण, राजीव जोशी, वामन पंडित, मुकुंद सावंत व सुषमा राऊत यांनी आपापल्या वाट्याला आलेला रघ्या सांगितला. रघुनाथने दिग्दर्शित केलेली ‘युगेन् युगे तुच’ हे लेखक अजय कांडर यांचे, ‘साठा उत्तराची कहाणी’ हे विक्रम भागवत यांचे आणि जयंत पवारांचे ‘जन्म... एक व्याधी’ ह्या तीन नाट्याकृती सादर झाल्या. स्वामीराज प्रकाशन नाट्यकर्मींचा पुरस्कार देऊन सन्मानित करते हे इथे प्रकर्षाने नमूद करायला हवं. अतुल परचुरे रंगस्मृती पुरस्कार यंदा चेतन दळवी यांना, सेवाव्रती पुरस्कार जयवंत देसाई यांना, तर भाऊ कोरगावकरांचा प्रयोगघर पुरस्कार अमर हिंद मंडळास प्रदान करण्यात आला. डॉ. अनिल बांदिवडेकर, अनिल गवस आणि ज्ञानेश महाराव यांनी सांगता सोहळ्याचा समारोप वरील पुरस्कार देऊन केला. उद्घाटन सोहळ्याला सुद्धा जनार्दन लवंगारे, अरुण नलावडे आणि ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या उपस्थितीने महोत्सव यशस्वी होणार याचे जणू भाकीत वर्तवले होते. रघ्याचा लोअर परळ ते कणकवली व्हाया देवगड हा प्रवास अचंबित करुन टाकणारा आहे. अमोल मुझुमदारला पाहिलं की करीयरची तुलना म्हणून मांडायची झाल्यास दोघेही स्थानिक प्रदेशातच अफलातून खेळले. टेस्टमॅच किंवा मेन स्ट्रीम व्यावसायिक नाटक दोघांच्याही नशिबात नव्हतं. पण एकाने महिला वर्ल्ड कप जिंकून दिला आणि एकाने स्वामीराज महोत्सव...!






