Saturday, June 6, 2026

Usha Nadkarn : स्पष्ट बोलण्यास कारण की...

Usha Nadkarn : स्पष्ट बोलण्यास कारण की...

स्पष्टवक्तेपणा या स्वभावामुळे मराठी कलाक्षेत्रात ज्या दोन व्यक्तींना प्रामुख्याने ओळखले जाते; त्या वक्ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्यव्यवस्थापक अशोक मुळ्ये...! आता अशा दोन व्यक्ती एकाच व्यासपीठावर एकत्र आल्यावर काय होईल, याची खात्री कुणीच देऊ शकत नाही. पण असा एक योग अलीकडेच रसिकजनांच्या अलगद ओंजळीत आला. मात्र तिथे स्पष्टवक्तेपणाची बेरीज होत असताना, थेट प्रेमाचा झरा वाहू लागला आणि उपरोक्त स्वभाववैशिष्ट्यांच्या मागे लपलेल्या मनमिळावू स्वभावाचे दर्शन सर्वांना झाले. अफलातून संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यात हातखंडा असलेले अशोक मुळ्ये हे नेहमी काहीतरी निमित्त शोधतच असतात आणि यावेळी त्यांच्या मनात आले की उषा नाडकर्णी यांचा ८० वा वाढदिवस साजरा करायचा. तसा त्यांनी तो केलाच; पण त्यानिमित्ताने तमाम रसिकवर्गाला उषा नाडकर्णी यांचे स्पष्ट विचार ऐकायला मिळाले. यातून त्यांचा सच्चा स्वभाव सर्वांनाच कळून चुकला.त्यांच्या याच मनोगताचा आढावा त्यांच्याच शब्दांत, खास 'राजरंग' कॉलमच्या वाचकांसाठी...

"सर्व रसिक प्रेक्षकांना मी नमस्कार करते. खरे तर वाकून नमस्कार करायचा होता; पण वयामुळे वाकता येत नाही हो...! बोलून दाखवता येते मला; पण असे वाकता येत नाही. अशोकरावांनी मला फोन केला आणि मला सांगितले, "माझ्या वाढदिवसाचा सोहळा त्यांना करायचा आहे." मी म्हटले, "तू माझा सत्कार करशील आणि उगाच लोकांना वाईट वाटेल". त्यावर ते म्हणाले, "मी आहे ना; घाबरू नकोस. अजिबात कुणाची पर्वा करू नकोस". मी त्यांना म्हणाले, "मी कुणालाही घाबरत नाही. पण लोक पाठीमागे जे बोलतात ना, ते ऐकू येते आणि त्याचे खूप वाईट वाटते, म्हणून मी नको म्हणते." पण अशोक माझ्या भावासारखा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी मी आले, त्याने माझा सत्कार केला. खरे सांगू का, घरी जर हा सोहळा केला असता तर इतके लोक माझ्या वाढदिवसाला आले नसते. कारण मी बोलवतच नाही कुणाला...! पण न सांगता, न ठरवता सगळे अशोकरावांच्या कार्यक्रमाला आले आणि त्यामुळेच मला इतके रसिक प्रेक्षक मिळाले.

"> " class="section-post-content-internal-post-title">Chandrashekar Bawankule : देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याच्या प्रारूपाला स्थगिती

 हिवाळी अधिवेशनात नवा कायदा आणणार; लोकभावना लक्षात घेऊन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : राज्यातील देवस्थाने आणि मंदिरांच्या ...

तुमच्यासारख्या लोकांची कृपा आहे म्हणूनच आम्ही आजपर्यंत काम करत आहोत. जर आमचे काम तुम्हाला आवडले नसते, जर तुम्ही आम्हाला दाद दिली नसती; तर आम्हाला कुणीही विचारले नसते. पण तुम्ही येता, आमच्या नाटकांना दाद देता; हे खूप महत्त्वाचे आहे. आता वयोमनापरत्वे नाटक करता येत नाही. पण मागे 'लंडनच्या आजीबाई' हे नाटक केले होते. त्यात मला इतकी धाप लागायची की संपूर्ण नाटकभर मी एकटीच बोलत असायचे. खूप धावपळ व्हायची माझी. माझ्या मुलाने हे नाटक पाहिले आणि मला तो म्हणाला, "आता नाटक करू नकोस". हे माझे शेवटचे नाटक होते. मी नंतर नाटक केले नाही, पण मला खूप वाईट वाटले. खूप छान नाटक होते ते...! या नाटकात जी गोष्ट होती, ती यवतमाळच्या एका आजींची होती. त्यानंतर त्या लंडनमध्ये गेल्या. त्यांनी जे भोगले आहे, ते सगळे मी नाटकात दाखवले होते.

जेव्हा मी लंडनला या नाटकाचा प्रयोग केला, तेव्हा त्यांच्या सगळ्या मुली आमच्यासमोर बसल्या होत्या. नाटक संपल्यानंतर त्या माझ्याजवळ धावत आल्या आणि त्यांनी मला कडकडून मिठी मारली. या आजीचा तिथे बंगला होता, पण ती स्वतः अक्षरशत्रू होती. मात्र खानावळीचा उद्योग करून तिने खूप पैसे कमावले. आपल्या भारतातून लंडनला जाणारे लोक तिच्याकडेच जेवायला जायचे.

"> " class="section-post-content-internal-post-title">Chandrashekar Bawankule : देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याच्या प्रारूपाला स्थगिती

 हिवाळी अधिवेशनात नवा कायदा आणणार; लोकभावना लक्षात घेऊन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : राज्यातील देवस्थाने आणि मंदिरांच्या ...

आम्ही जेव्हा नाटक करतो, तेव्हा त्यात कितीतरी गोष्टी खऱ्याच असतात. मी आतापर्यंत खूप काम केले, खूप अनुभव मिळाले. अनेक सहकलाकार मिळाले, दिग्दर्शक मिळाले. रंगमंचावर काम करणारे लोक मिळाले. मेकअपदादा, स्पॉटदादा हे सगळे होते म्हणून आम्ही आहोत. हे सगळे आतमध्ये काम करणारे लोक; पण हे लोक जर नसतील, तर रंगमंचावर नाटक होऊ शकत नाही. स्पॉटवाले असोत किंवा सेटिंगवाले असोत; ही मंडळी किती मेहनत करतात, ते आम्हाला माहीत आहे. त्यांच्यामुळेच रंगमंचावर सर्वकाही घडते. या मंडळींची आपण विचारपूस करायला पाहिजे. मी तर माझ्या नाटकातल्या सगळ्या मंडळींशी चांगले वागते. या लोकांवर जेव्हा तुम्ही प्रेम करता; तेव्हा ही मंडळी सुद्धा तुमच्यावर प्रेम करतात.

आता मला सगळे म्हणतात की 'तू फटकळ आहेस'. पण माझे असे म्हणणे आहे की खरे बोलणे म्हणजे फटकळपणा नाही. एखादा माणूस चुकीच्या गोष्टी करत असतो; परंतु 'तू हे चुकीचे करतोस' असे कुणी त्याला सांगत नाही. पण हे जे खरे सांगणे असते; त्याला जर तुम्ही फटकळपणा म्हणत असाल तर मला काहीच म्हणायचे नाही. हो, आहे मी फटकळ...! तुमच्यात जो दम नाही बोलायचा, तो माझ्यात आहे. मी घाबरत नाही. मी स्पष्ट बोलते. माझे काम मी चोख करते. सांगितलेल्या वेळेला येते. माझ्या घरी कुणी येणार असेल, तर मी ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास अगोदर तयार असते. असो.! तसा माझा सत्कार कुणी करत नाही; पण माझ्या या भावाने माझा सत्कार केला; त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते".

___राजरंग राज चिंचणकर
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा