Wednesday, January 21, 2026

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

टीईटीच्या निकालात यंदा  ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा

उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशातील सर्व शाळांमधील शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केल्याने यंदा राज्यात सुमारे पावणेपाच लाख उमेदवारांनी परीक्षा दिल्याचा विक्रम झाला. डीएड/बीएड पदविकाधारकांसह कार्यरत शिक्षकांच्या संख्येमुळे यंदा निकालाचा टक्का ८.५३ टक्क्यांपर्यंत वाढला. आगामी काळात कार्यरत शिक्षक आणि डीएड पदविकाधारकांसाठी स्वतंत्र परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) अंतरिम निकाल जाहीर झाला आहे. परीक्षा परिषदेतर्फे २३ नोव्हेंबरला राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेण्यात आली. अंतरिम उत्तरसूची १९ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक १ आणि २ च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तरांसंदर्भातील त्रुटी, आक्षेप २७ डिसेंबरपर्यंत मागविण्यात आले होते. दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची १३ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर नुकताच अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

अंतरिम निकाल ऑनलाइन प्रणालीद्वारे उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निकालावर आक्षेप किंवा त्रुटी नोंदविण्यासाठी २१ जानेवारीपर्यंत मुदत आहे. उमेदवारांना त्यांच्या लॉगिनद्वारेच आक्षेप नोंदवता येणार आहेत. अन्य मार्गाने आलेल्या आक्षेपांचा किंवा अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.

या परीक्षेसाठी ४ लाख ७५ हजार ६६९ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख तीन हजार ३३४ उमेदवारांनी पेपर एकसाठी, तर २ लाख ७२ हजार ३३५ उमेदवारांनी पेपर दोनसाठी नोंदणी केली आहे. परीक्षा परिषदेने २०१३ पासून आठ वेळा टीईटी परीक्षा घेतली. परीक्षा दिलेल्या २९ लाख ७४ हजार ६०० उमेदवारांपैकी १ लाख ६ हजार ६६३ उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यामुळे टीईटीमध्ये पात्र ठरण्याचे सरासरी प्रमाण ३.५ टक्के आहे. आतापर्यंत सर्वाधिक निकाल २०१८ मध्ये ५.१३ टक्के, त्यापूर्वी २-१३ मध्ये ५.०२ टक्के लागला होता. बाकी सर्व परीक्षांचा निकाल २.३ टक्के ते ३.७० टक्के या दरम्यान आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >