संघटनातील अनेक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी
गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ११५ पैकी ८८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. भाजप जिल्हाध्यक्षांसह मंडळ अध्यक्ष, विविध आघाड्यांचे अध्यक्ष आणि भाजप संघटनेतील पदाधिकाऱ्यांना नगरसेवक बनण्याची संधी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उमेदवारी देताना भाजपने सर्वच समाजघटकांचा विचार केलेला आहे.
वसई-विरार महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुती म्हणून लढत आहे. श्रमजीवी संघटना आणि आगरी सेनेला सुद्धा महायुतीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. महापालिकेच्या ११५ जागांपैकी ८८ जागा भाजप लढवित असून, शिवसेना २७ जागांवर लढत आहे. श्रमजीवी आणि आगरी सेनेला भाजपच्या कोट्यातूनच उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, पालघर लोकसभा आणि जिल्ह्यातील पाच विधानसभा जिंकल्यानंतर आणखी संघटन मजबूत केलेल्या भाजपने नुकताच झालेल्या नगरपरिषद ,नगरपंचायत निवडणुकीमध्ये दोन नगराध्यक्षांसह ५० नगरसेवक निवडून आणले आहेत. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे काम भाजपने केले आहे. वसई विरार मध्ये सुद्धा पक्ष वाढीसाठी कार्य करणाऱ्या अनेक पदाधिकारी,कार्यकर्त्यांना भाजपने महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, माजी विधानसभा प्रमुख मनोज पाटील, महामंत्री विश्वास सावंत, उपाध्यक्ष नारायण मांजरेकर, युवा मोर्चा प्रदेश सचिव अशोक शेळके, प्रदेश सचिव अपर्णा पाटील, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष मॅथ्यू कोलासो, सरचिटणीस विजेंद्र सिंग,युवा मोर्चा आघाडी अध्यक्ष विनित तिवारी, वसई रोड मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर, वसई पूर्व वालीव मंडळ अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, नालासोपारा तुळींज मंडळ अध्यक्ष प्रमोद सिंग, विरार पश्चिम मंडळ अध्यक्ष विशाल राऊत, वसई ग्रामीण पश्चिम अध्यक्ष आशिष जोशी यांच्या पत्नी मनिषा जोशी यांच्यासह उत्तम कुमार, रवी पुरोहित, गौरव राऊत, जॉन बावटीस, युगा वर्तक, स्मिता लोपीस, मेहुल शहा, राजीव म्हात्रे, पिंकी कवर- राठोड, ॲड. दर्शना त्रिपाठी, दीपा चावडे, गणेश पाटील, कमलेश खटावकर, नीतू झा, सुचिता शेट्टी, श्रमजीवीचे महेश धांगडा आणि आगरी सेनेच्या विजय घरत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
१४ उत्तर भारतीय निवडणूक रिंगणात
महापालिका निवडणुकीच्या आनुषंगाने उत्तर भारतीय समाजामध्ये भाजप विरोधी वातावरण करण्याचा प्रयत्न काहींकडून केल जात होता. विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर भारतीय मतदारांचा उपयोग करून घेण्यात आला. असा संदेश पसरविणाऱ्यांना भाजपने चांगलीच चपराक दिली आहे.या निवडणुकीत भाजपने १४ उत्तर भारतीय नागरिकांना उमेदवारी दिली आहे.






